पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांनी घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर येत्या आठ दिवसांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, नेते राजेंद्र वागस्कर, वसंत मोरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते गजानन काळे, यांच्यासह विद्यार्थी आणि मनसैनिक सहभागी झाले. तर विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना अमित ठाकरे यांनी दिले. विद्यापीठात विद्यार्थ्यांना मेसमध्ये चांगले जेवण मिळत नाही.
त्यामध्ये विद्यापीठ प्रशासन सुधारणा करत नाही. विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, यासह अनेक मागण्या केल्या आहेत. त्यावर कुलगुरू यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा आहे, असे ठाकरे म्हणाले.
ड्रग्जप्रकरणी फडणवीसांनी लक्ष द्यावे
पुण्यात ड्रग्सचे प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. तर पुणे पोलिसांनी जवळपास ४ हजार कोटींच्या रकमेचे ड्रग्स जप्त केले आहेत. याहीपेक्षा अधिक रक्कमेच ड्रग्स असू शकते. त्यामुळे या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज असून गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली आहे.