Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
मात्र, त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याचं बोलून दाखवलं आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता कुणाचं ऐकणार नसून आंदोलन करणारच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दांचा सन्मान ठेवला. जे जे मंत्री आले त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांचा सन्मान केला. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं ही आमची भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.