जालना – मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले आहे. पण फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, आचारसंहिता कधी लागतील मला माहित नाही. मात्र २४ तारखेच्या आतच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागो की २५ ला लागो, आमचा निर्णय २४ डिसेंबरलाच होणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात. त्यामुळे २४ डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे. फेब्रुवारी आता खूप लांब आहे.
शांततेचे, एकत्र राहण्याचे आवाहन
समाजाशी संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आजपासून पुन्हा जात आहे. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यासाठी जात आहे, समाजाला डाग लागू द्यायचा नाही. २३ तारखेला घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे. सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असे वाटते. मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणा दाखवणे आता आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी घेणे सोपे नाही, असेही यावेळी जरांगे यांनी म्हटले आहे.