Manipur Violence : मणिपूरच्या गृहविभागाने समाजकंटकांकडून व्हायरल होणारे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ रोखण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी वाढवली असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही दिवसांत ही बंदी मागे घेतली जाईल, असे आश्वासन मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांनी दिले होते, मात्र काही समाजकंटक द्वेषयुक्त भाषण, व्हिडीओ इंटरनेटवर टाकत असल्याने आता इंटरनेट बंदी वाढवल्याचे म्हटले जात आहे.
मणिपूरमध्ये मागील काही महिन्यापासून हिंसाचार उफाळला आहे. याच हिंसाचाप्रकरणी राज्यातील तरुण, विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री सिंग यांनी केली होती. मणिपूर हिंसाचार चिघळत गेल्याने सरकारने इंटरनेट बंदी आणली होती. सप्टेंबर महिन्यात १४३ दिवसांनी ही बंदी उठवण्यात आली होती. परंतु, २६ सप्टेंबरला पुन्हा मोबाइल इंटरनेट डेटा सेवा खंडित करण्यात आली. त्यानंतर, प्रत्येक पाच दिवसांनी ही बंदी वाढवण्यात येत आहे.
दरम्यान, काल गृह विभागाच्या अधिसुचनेनुसार, काही समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करून द्वेषयुक्त भाषण, व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी इंटरनेट बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. २३ सप्टेंबर रोजी ही बंदी उठवण्यात आली होती. परंतु, दोन तरुणांच्या मृतदेहांच्या छायाचित्रांनंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. परिणाीम २६ सप्टेंबर रोजी इंटरनेट बंदी पुन्हा लागू करावी लागली. त्यातच काही दिवसांपूर्वी सरकारकडून दिलेले आश्वासन आता पुढे ढकलण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.