Supriya Sule : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ यासारख्या घटना घडत आहेत. राज्यात सुरू असलेल्या घटनेनंतर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. नुकतीच ही
बैठक संपली असून राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सत्तेत असलेले आमदारही या आंदोलनात उतरल्याने आंदोलनात उतरले आहे. तसेच राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला एक सल्ला दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की तुमच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. जालन्याला ज्या अमानुषपद्धतीने महिला आणि मुलांवर लाठीमार केला. लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार असंवेदनशील आहे. याला पूर्ण जबाबदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. ”
“देवेंद्रजी आमच्या घराबाहेर येऊन म्हणले होते की, सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ. जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी १० दिवस वाढवून दिले. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायला ४० दिवस सरकारला दिले होते. ४० दिवसांची ही मॅजिक फिगर त्यांनी आणली कुठून? त्यामुळे फडणवीस सातत्याने फसवणूक करत आहेत”, अशीही टीका सुळेंनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर पाठवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार आहेत हे त्यांना माहित आहे. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला, आता घटकपक्षातील एकनाथ शिंदेंना दगा देत आहेत. त्यामुळे, अजित पवार गटाला माझी विनंती आहे, कधीतरी एका ताटात आपण जेवलोय म्हणून सांगत आहे. आता शिंदेंनाही धोका देत आहे. त्यामुळे आता सांभाळून राहा”, अशीही टीका सुळेंनी आज केली.
“ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास नाही”
“सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही”, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.