* पंतप्रधान मोदी यांचे भाजपला मतदान करण्याचे आवाहन
* स्थैर्य आणि शांतता हे निवडणुकीचे निकष व्हावेत
इंफाळ – भाजपचे “डबल इंजिन’च्या सरकारने मणिपूरसाठी आगामी 25 वर्षांची समर्थ पायाभरणी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पूर्व इंफाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. मणिपूरमध्ये गेल्या पाच वर्षांत स्थैर्य आणि शांतता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी हेच निकष मानण्यात यायला हवेत, असे सांगून पंतप्रधानांनी ईशान्य भारतातील जनतेने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
स्थापना होऊन 50 वर्षांमध्ये मणिपूरमध्ये अनेक सरकार आणि त्यांचे काम अनुभवले. मात्र कॉंग्रेसच्या दशकभराच्या राजवटीनंतरही मणिपूरच्या वाट्याला असमानताच आली. कॉंग्रेसने मणिपूरमध्ये बंद आणि कोंडीच निर्माण केली. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला आणि अत्यावश्यक वस्तूंची कमतरताच निर्माण झाली. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. मात्र भाजप सरकारने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे आणि मणिपूरच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले, असे मोदी म्हणाले.
कॉंग्रेसला ईशान्य भारतातील मुद्दे आणि प्रश्नही समजत नाहीत. मणिपूरच्या नागरिकांची खूप जुनी मागणी असलेली “इनर लाइन परमिट’ची मागणी भाजपने पूर्ण केली. बंद नळाद्वारे 3 लाख घरांना पिण्याचे पाणी, रेल्वेचे जाळे, 40 महामार्गांचे काम मार्गी लावण्यात आले आहे, असेही मोदींनी सांगितले. अनेक तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडला असून ते आता मणिपूरच्या विकासासाठी काम करत आहेत. मणिपूरमध्ये स्थैर्य कायम राखण्यासाठी भाजपचे सरकारच निवडून येणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.