दहिवडी (प्रतिनिधी) – आंधळी (ता. माण) येथे संजय रामचंद्र पवार (वय ४९) व मनीषा संजय पवार (वय ४५) या दाम्पत्याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची भयंकर घटना घडली आहे.
संजय व मनीषा हे दाम्पत्य आंधळीतील पवार दरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री दहानंतर विद्युत पंप सुरु करण्यास आले होते.
रात्री साधारण दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण खून केला.
सकाळी या परिसरातील शेतकरी शेतात जात असताना रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह आढळून आले. त्यानंतर ही माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली.
पोलिस पाटीलांनी ही माहिती दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरु असून लवकरच संशयित हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.