“जय श्रीराम’ बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबतात
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ममता बॅनर्जी या त्रेतायुगातील राक्षस हिरण्यकश्यपच्या वंशज आहेत, अशी टिपण्णी साक्षी महाराजांनी केली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. या वादग्रस्त विधान करुन त्यामध्ये अधिक भर पडली आहे.
साक्षी महाराज म्हणाले की, हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद “जय श्रीराम’ म्हणायचा, परंतु हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. याच गोष्टीची बंगालमध्ये पुनरावृत्ती होत आहे. मला असं वाटतंय की ममता बॅनर्जी हिरण्यकश्पच्या वंशज आहेत. बंगालमध्येदेखील “जय श्रीराम’ बोलणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना तुरुंगात डांबले जात आहे.
आता बंगालमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे की, “जय श्रीराम’ म्हणाल्यानंतर ममता बॅनर्जी चिडू लागल्या आहेत. त्या शिव्या देऊ लागल्या आहेत. रस्त्यावर उतरु लागल्या आहेत. विरोधात जाऊन विविध योजना बनवू लागल्या आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, “जय श्रीराम’ या घोषणेवरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण केले जाऊ लागले आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःची बाजू मांडली होती.