कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून येथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत रंगल्याचं चित्र आहे. राज्यात निवडणुका सुरु असतानाच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी, भाजपकडून लोकशाहीवर सुरु असलेल्या हल्ल्याविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची हीच वेळ असल्याचं नमूद केलंय.
ममता यांनी लिहलेल्या या ७ पानी पत्रामध्ये भाजपवर अनेक आरोप करण्यात आले असून लोकशाही व संविधानावर सुरु असलेल्या भाजपच्या हल्ल्यांविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
पत्रामध्ये राजधानी दिल्लीसाठी मंजूर करण्यात आलेल्या NCT विधेयकासह ७ अशा घटनांचा उल्लेख आहे ज्यांना ममता बॅनर्जी यांनी लोकशाही व संघराज्य पद्धतीविरोधी म्हटलंय. विरोधकांच्या एकीतून जनतेसमोर भाजपला सक्षम पर्याय उभा करण्याचा उल्लेखही या पत्रामध्ये आहे.
पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी, बिगर भाजप शासित राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग करून लोकनियुक्त सरकारला अडथळे निर्माण करीत आहे. राजधानी दिल्लीसाठी मंजूर करण्यात आलेल्या NCT विधेयक ‘गंभीर’ असून केंद्रातील भाजप सरकारने लोकनियुक्त सरकारचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले असल्याचा दावा करण्यात आलाय.