पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ वर पोहचली असून त्यातील बहुतांश रुग्ण परदेशातून भारतात आले आहे. परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परंतु मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे त्यांना घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
परदेशातून परतलेले नागरिक कोरोनाबाधित असतील तर जाताना ते कॅब चालक, त्यांचे नातेवाईक आणि इतर स्थानिकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे.
या मागणीसंदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, ‘घरात विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले असले, तरी नागरिकांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या उपलब्ध इमारतीत क्वारंटाईन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन बंधनकारक केल्यास इतर नागरिकांना याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल.