मुंबई : माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप आणि त्याचा मित्र हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून गावी माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ त्यांच्या चारचाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासह असलेला मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावला असल्याने सुदैवाने वाचला. ही घटना रात्री बाराच्या दरम्यान घडली.
दरम्यान, विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या अपघातामुळे राजकीय क्षेत्रासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. सुदैवाने अपघातात नेत्यांचा जीव वाचला आहे. आतापर्यंत बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे या सगळ्या नेत्यांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने सगळ्या नेत्यांची प्रकृती नीट आहे. मात्र नेत्यांच्या होत असणाऱ्या अपघातांमुळे अपघात की घातपात असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.