निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये घ्यायचे की नाही, हा घोळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कॉंग्रेसच्या पुनर्बांधणीचा सारा विषय किशोर यांना कॉंग्रेसमध्ये घेण्याशी निगडित होणे हाही एक चमत्कारिकच भाग म्हणायला हवा. शंभरी पार केलेल्या पक्षाचे भवितव्य केवळ या एका माणसाशी निगडित झाल्यासारखी आजची स्थिती कॉंग्रेसला कितपत शोभादायक आहे, याचा पक्षानेच विचार करायला हवा. प्रशांत किशोर हे हुशार निवडणूक रणनीतिकार आहेत, हे खरे आहे.
मोदींना पंतप्रधान करण्यापासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यापर्यंत अनेक निवडणूक चमत्कार त्यांनी घडवले आहेत. त्यामुळे तेच कॉंग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणून देऊ शकतील, असा विश्वास बाळगण्यात अडचण नसली, तरी त्यांच्या बाबतीतला सारा विषय त्यांची केवळ निवडणूक सेवा घ्यायची की त्यांना थेट पक्षातच घेऊन त्यांच्या ताब्यात पक्षाची सारी सूत्रे सोपवायची या मुद्द्यावर येऊन पोहोचला असून हा निर्णय अजून कॉंग्रेसला घेता आलेला नाही. गेले सुमारे वर्षभर हा खेळ सुरू आहे. कॉंग्रेसची नेमकी अडचण हीच आहे, त्यांना पटकन निर्णय घेणेच जमत नाही. हा एक स्थितीवादी पक्ष मानला गेला आहे. सध्याची जी स्थिती आहे त्यात चटकन बदल करणे किंवा तडकाफडकी निर्णय घेणे ही कॉंग्रेसची कार्यपद्धतीच नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना पक्षात घ्यायचे की नाही, हा साधा निर्णय घ्यायलाही त्यांना महिनोन्महिने लागतात.
खरे पाहता प्रशांत किशोर यांच्यासारखा कसबी रणनीतिकार स्वत:हून पक्षात यायला तयार असेल, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी इतकी खळखळ करण्याची गरजच नव्हती. त्यांच्या येण्याने पक्षातील जुनेजाणते नेते नाराज होण्याचेही काही कारण नव्हते, पण तोच मुख्य मुद्दा केला गेला आणि प्रशांत किशोर यांचा कॉंग्रेसमधील प्रवेश सुमारे वर्षभर लांबला. किशोर कॉंग्रेसमध्ये किती दिवस राहतील, असा प्रश्न अशोक गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांना पडला आहे. त्यांनी तो थेटपणे उपस्थितही केला आहे. त्याला किशोर यांनी तितक्याच तत्परतेने उत्तर दिले आहे. मी कॉंग्रेसमध्ये किती दिवस राहणार, हा प्रश्न तुमच्याशी निगडित आहे, कारण तुम्ही माझे किती ऐकता त्यावर मी पक्षात किती दिवस राहणार हे ठरणार आहे, असे किशोर यांनी गेहलोत यांना ऐकवले आहे. म्हणजे आपल्या एकट्याच्या तंत्रानेच पक्ष चालवला पाहिजे अशी त्यांची भूमिका दिसते आहे, ही भूमिका कॉंग्रेसमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना कितपत मानवणार, हेही पाहायला हवे.
किशोर यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांबरोबर आतापर्यंत तीन बैठका घेऊन त्यांच्या पुढे कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या संबंधात स्लाइड शोद्वारे प्रेझेंटेशन केले आहे. त्यात काही मूलभूत सूत्रेही त्यांनी मांडली आहेत. त्यांच्या या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कॉंग्रेसने ज्येष्ठांची एक समितीही नेमली आहे. म्हणजे किशोर यांनी कितीही चमकदार कल्पना पक्षाच्या पुढे मांडल्या तरी त्यावर तडकाफडकी निर्णय होणार की नाही, यावर कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. कॉंग्रेसने पटकन निर्णयच घेतले नाही आणि त्यांच्या नेहमीच्या खाक्याने ते केवळ समित्या नेमत बसले, तर किशोरही कॉंग्रेसला वर आणू शकणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. त्यातच किशोर हे देशातल्या अन्य नेत्यांशीही संबंधित आहेत त्यामुळे या नेत्यांना सोडून केवळ कॉंग्रेसचेच काम करीत राहणे त्यांना कितपत मानवेल, हेही पाहावे लागेल.
एकीकडे किशोर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच्याच काळात ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या घरी जाऊन राहिले होते. मधूनच ते कोलकात्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही संधान साधून असतात. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना कॉंग्रेसमध्ये काम करायचे असेल, तर अन्य पक्षांशी असलेले संबंध तोडावे लागतील अशी जाहीर सूचनाही केली आहे. गेल्या आठवडाभरातील या साऱ्या घडामोडी आहेत. किशोर आणि कॉंग्रेस यांच्यातील चर्चेच्या प्रक्रियेला प्रसार माध्यमांनीही चांगली प्रसिद्धी दिली आहे. अन्यथा गेले अनेक दिवस कॉंग्रेसला प्रसारमाध्यमांमध्ये इतके महत्त्वाचे स्थान मिळणेही दूरापास्त झाले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्य विषय असा आहे की, जरी किशोर हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेऊन ते तेथे सक्रिय झाले तरी कॉंग्रेसला केंद्राच्या सत्तेत कमबॅक करणे तितके सोपे राहिले आहे काय? या प्रश्नाला आजच्या घडीला तरी नाही असेच उत्तर द्यावे लागेल. कारण आज पक्षाच्या एकूण स्थितीवर नजर टाकली तरी मोदींच्या विरोधात असलेल्या नाराजीचा लाभ उठवण्याची क्षमता कॉंग्रेसकडे राहिलेली नाही, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे व्यक्तिगत स्तरावर लोकप्रिय असले तरी पक्षाला विजय खेचून आणण्या इतकी लोकप्रियता त्यांच्यात नाही, हे पुन:पुन्हा सिद्ध झाले आहे. राहुल गांधी हे स्वच्छ प्रतिमेचे सरळ मार्गी नेते आहेत आणि मोदींच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांच्या विरोधात बोलण्याची ताकद आज केवळ राहुल गांधी हेच दाखवू शकले आहेत, हेही शंभर टक्के खरे आहे. पण त्यांच्या प्रतिमेचे सातत्याने जे पद्धतशीर खच्चीकरण केले गेले आहे त्यातून त्यांच्याकडे मोदींचा समर्थ पर्याय म्हणून पाहता येत नाही. तसेच आजवर पक्षाने जपून ठेवलेला प्रियंका गांधी नावाचा हुकमी एक्काही आज मतांच्या राजकारणात फेल गेलेला दिसतो आहे. स्थानिक पातळीवरील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अन्य पक्षांकडे जाताना दिसताहेत. पूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण आज कॉंग्रेसमधून आम आदमी पक्षाकडेही आउटगोईंग सुरू झाल्याने कॉंग्रेसपुढे आज मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. अशा बिकट स्थितीत कॉंग्रेसचे तारू सुरक्षितपणे किनाऱ्याला लावण्याची क्षमता किशोर दाखवू शकतील काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खरे म्हणजे ही आता कॉंग्रेसची नव्हे तर किशोर यांच्याच अंगभूत कौशल्याची परीक्षा असणार आहे.