पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा अजून काही ठिकाणी कायम आहे. तर, वंचित बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आघाडील तिन्ही पक्ष बुचकळ्यात पडले आहेत.
वंचित बहुजन विकास आघाडीने गेल्या काही दिवसांत सातत्याने भूमिका बदलली आहे. सुरुवातीला जागा वाटपावरून अडून बसलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नंतर स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. पाठोपाठ त्यांनी पहिल्या टप्प्यात आठ उमेदवारांची यादीही जाहीर केली. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.
पण, अॅड. आंबेडकर यांनी भूमिका बदलत काही ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि काॅंग्रेसच्या काही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे पहिल्या यादीत ज्यांना उमेदवारी जाहीर केली, त्यातील काही जणांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने रामटेकमध्ये शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला होता. बुधवारी त्यांनी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला.
अमरावतीमध्ये प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र, त्यांनी अर्ज भरला नव्हता. नंतर तेथून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. पण वंचितने तो न दिल्याने आंबेडकर यांनी बुधवारी रात्री पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. पण, गुरुवारी वंचितने आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आता अमरावतीत वंचितचा उमेदवारच नाही.
परभणीमध्ये वंचितने बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. तर, बारामतीत उमेदवार न देता वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे.
काॅंग्रेस पक्ष अजूनही आशावादी
अॅड. आंबेडकर हे महाविकास आघाडीत येण्याबाबत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अजूनही आग्रही आणि आशावादी असल्याचे दिसून येत आहे. मतविभाजन टाळण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या प्रस्तावावर आंबेडकर यांच्याकडून अजूनही उत्तर आलेले नाही, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर येथे दिली आहे.