शिरूर- राज्यातील ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत विश्वासघात केला, मराठा आरक्षणाबाबत विश्वासघात केला. कोविडमध्ये जनतेचा विश्वासघात केला आहे.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे पैसा गोळा करण्यासाठी व भ्रष्टाचार करण्यासाठी तयार झालेला सरकार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, धर्मेंद्र खांडरे, माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या नवीन प्रभाग पद्धती वर बोलताना सोमय्या म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जायला भाजप तयार आहे; परंतु आघाडी सरकारने बनवाबनवी व फसवाफसवी थांबवावी.
भाजपचे लक्ष मुंबई महानगरपालिका किंवा निवडणुका नाही, असे सांगताना किरीट सोमय्या म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 21 महिन्यांत उद्धव ठाकरे यांच्या “अलीबाबा चाळीस चोर’ सरकारने जी लूटमार केली आहे. यामुळे महाराष्ट्र बुडत चालला आहे.
चौकशी करा नौटंकी नको
दरेकर यांच्याबाबत जे भ्रष्टाचाराचे आरोप उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब करत आहेत. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, मग घोटाळ्याची चौकशी केवळ नौटंकी नाटक करण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे.