कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू झाल्याचीदुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी बोरपाडळे घाटातून हॉटेलच्या दिशेने जाताना ही दुर्घटना घडली असून यात हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात ही दुर्घटना घडल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे.
संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव अभिजित पांडुरंग ठाणेकर असून ते आजरा तालुक्यातील पिंपळगाव झुलपेवाडी येथील रहिवासी आहेत. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या हॉटेलच्या दिशेने जात होते.
दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. या आगीचं रुप इतकं भयंकर होतं की कारने एका क्षणातच रौद्ररूप धारण केलं.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे महामार्गावर बराच काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. विशेष म्हणजे, आपली कार गरम होतं असल्याची माहिती अभिजित यांना आधीपासूनच होती. याबाबत अभिजित यांनी आपल्या मित्राला फोन करून कार गरम होतं असल्याची माहिती दिली होती.
धोका डोळ्यासमोर दिसत असताना, अभिजित यांनी आपल्या कारमधून प्रवास केला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एअरबॅगचा स्फोट झाल्याने अभिजित कारमध्ये अडकले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.