माधव विद्वांस
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी येथे 23 एप्रिल 1873 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडी येथेच झाले. वर्ष 1891 मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी जमखिंडी येथे शिक्षक म्हणून काम केले. वर्ष 1893 मध्ये पुण्याच्या फर्गसन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पुण्यामध्ये खासगी शिकवणी व श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी शिष्यवृत्ती यावर त्यांनी कष्टाने बीए पूर्ण केले.
महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात मोठा वाटा उचलला होता. न्या. रानडे, रा. गो. भांडारकर इत्यादी विचारवंतांचा त्यांच्यावर प्रभाव पडून 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. वर्ष 1898 मध्ये ते कायदा पदवीच्या अभ्यासासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थना समाज व कोलकाता येथील ब्राह्मो समाज यांच्या शिफारशीनुसार ब्रिटिश ऍन्ड फॉरेन असोसिएशनने त्यांना ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी पाठविले. तेथे 1901 ते 1903 या कालावधीत त्यांनी तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्माचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. वर्ष 1903च्या सप्टेंबरमध्ये ऍमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस भारताचे ब्राह्मो समाजाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले व “हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. भारतात परत आल्यावर 1903च्या अखेरीस मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.
वर्ष 1906 मध्ये त्यांनी निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना केली. संपूर्ण भारतात त्याच्या शाखा काढल्या. वर्ष 1917 मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता राष्ट्रीय प्रश्न म्हणून मान्यता मिळवली. “डिप्रेस्ड क्लासेस मिशन’मधून अस्पृश्य मुलांना साधारण शिक्षणासह व्यावसायिक शिक्षण देणे, अस्पृश्यता परिषदा भरविणे आणि सहभोजने आयोजित करणे ही महत्त्वाची कामे त्यांनी केली. वर्ष 1918 ते 1920 या काळात त्यांनी सर्व भारतात अस्पृश्यता दूर करण्याच्या परिषदांचे आयोजन केले. यापैकी काही परिषदांमध्ये महात्मा गांधी आणि महाराज सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. वर्ष 1928 मध्ये त्यांनी “ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली. इंग्लंडमधील रोजनिशीमध्ये त्यांनी बोटीवरील प्रवासाचे अनुभव लिहिले आहेत. फ्रान्समधील भेटीतील रोजनिशीमध्ये प्रवास वर्णनात तेथील इमारतींचे कलासौंदर्य, मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा याबाबत लिहिले आहे. वर्ष 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा संशोधनपर ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. या विषयावरील प्रकाशित झालेला भारतातील हा पहिला ग्रंथ होय. या विषयावर गांभीर्यपूर्वक संशोधन तसेच सर्वेक्षण करून अनेक लेख लिहिले.
शेतीमालाचा भाव हा भारतीय शेतीसंबंधीचा कळीचा मुद्दा त्यांनी 1931 मध्ये उचलून धरला. शेतकरी हा या मालाचा निर्माता असतो; परंतु आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला असत नाही. दुर्दैवाने हा प्रश्न 90 वर्षे झाली तरी अजूनही सुटलेला नाही. 2 जानेवारी 1944 रोजी त्यांचे निधन झाले. अभिवादन.