कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्समधून घेतलेल्या कर्जातून कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी आज हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. तसेच गांधीनगरजवळील पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन करण्यासाठी ठिय्या मांडला.
यावेळी पाण्यात आंदोलन करण्यासाठी निघालेल्या महिलांना अडवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत झालेल्या धक्काबुक्कीत 3 महिला पोलीस कर्मचारी आणि 4 आंदोलक महिला जखमी झाल्या आहेत.
हा प्रकार जवळपास अर्धातास सुरू होता. जोपर्यंत मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. कोल्हापुरात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यातून कोल्हापूरकर अद्याप सवरलेल्या नाहीत.
त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीने थेट कर्जवसुली सुरू केली आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्या हजारो महिला अस्वस्थ आहेत. महापुरात सर्वच वाहून गेले आणि सरकारी मदत तर मिळालीच नाही. मग हे कर्ज फेडायचे तरी कोठून अशा विवंचनेत सापडलेल्या या महिलांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले.
वारंवार मागणी करूनही कर्जमाफीबाबत प्रशासन सकारात्मक नसल्याने या महिलांचा संयम संपल्याने नदीत जाऊन त्यांनी जल आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. हजारोंच्या संख्येने आलेल्या या महिलांचा अंदाज प्रशासनाला न आल्याने त्यांना रोखताना चांगलीच झटापट उडाली.
दरम्यान, महापुराचे चटके सहन करत या महिला जीवन जगत आहेत. त्यांना खरेतर सरकारने आधार देण्याची गरज होती. मात्र त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे महिलांना संघर्ष करण्याची वेळ आल्याचे या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दिव्या मगदूम यांनी सांगितले.
दरम्यान तीन दिवस आम्ही याठिकाणी जनआंदोलन करणार आहोत. तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास आम्ही जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.