Maharashtra Weather : राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता असून डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे.
मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.
राज्यात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरलं आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी पडू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे.
दाट धुक्यामुळे परिसरातील शेत तसेच रस्ते देखील दिसून येत नसल्याचे चित्र होते. ‘मॉर्निंग वॉक’ ला जाणाऱ्या येवलेकरांनी या गुलाबी थंडीसह दाट धूक्याच्या चादरीचा मनमुराद आनंद घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते.