मुंबई – करोना रुग्णसंख्या अशीच कमी होत गेली तर मार्चनंतर शंभर टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळल्याने टास्क फोर्सने मार्चनंतरच संपूर्ण अनलाॅक करण्याची ही सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, करोनाची तिसरी लाट ओसरत असल्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, चौपाट्या, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. पण मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहं, नाटयगृहं 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईने लसीकरणाच्या साथीने कोविडवर नियंत्रण मिळवले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण 100% पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे मुंबईत राजकिय घडामोडींनाही गती येतेय. त्यामुळेच या महिन्याअखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररेज सरासरी 500 कोरोना रुग्ण आढळत आहेत. हा आकडा कोरोनानं मुंबईत थैमान घातलं होतं, त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारी अखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.