संगमनेर – सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर इंदुरीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत पत्रात लिहिले आहे की,’ महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिलावर्ग. आज गत आठ दिवसांपासून माझ्या किर्तणरूपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
पुढे ते म्हणाले, ‘तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरूपी सेवेत समाज प्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरूपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धींगत व्यावे ही सदिच्छा!’