मुंबई – एकीकडे करोनाबाधितांची वाढती संख्या, तर दुसरीकडे वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा यांमुळे अनेक राज्यांत गंभीर पेचप्रसंग उद्भवत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद ठरलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी कळकळीची विनंती केली आहे. प्रसंगी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यांना ऑक्सिजनचे वाटप करण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हाती आहेत. त्या अधिकारांचा वापर करून केंद्राने महाराष्ट्राला अधिकाधिक ऑक्सिजन पुरवावा. ऑक्सिजन वाहतूक वेगाने व्हावी यासाठी टॅंकर्सना ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करावा. ती विनंती मी पुन्हा-पुन्हा करत आहे.
जनतेचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार सर्व काही करण्यास तयार आहे, असे टोपे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि लसींच्या पुरवठ्याबाबत महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप सातत्याने राज्यातील सत्तारूढ पक्षांचे नेते करत आहेत. अशात टोपे यांनी केंद्र सरकारला आर्जवी विनंती केली आहे.