कोलकता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भरघोस मतदानाचे सत्र गुरूवारी सहाव्या टप्प्यातही अबाधित राहिले. त्या मतदानाला तुरळक हिंसाचाराचे गालबोट लागले. मात्र, आधीच्या टप्प्यांच्या तुलनेत मतदान मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडले.
सहाव्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 79 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतरही मतदानाचा अवधी बाकी असल्याने अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढेल. सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी मतदान झाले. त्यामुळे 306 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. आता त्या राज्यात मतदानाचे केवळ दोन टप्पे उरले आहेत.
त्यासाठी 26 आणि 29 एप्रिलला मतदान होईल. दरम्यान, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दोन टप्प्यांसाठी निवडणूक आयोगाने प्रचारावर काही निर्बंध लादले. त्यानुसार, रोड शो आणि वाहन रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे.
त्याशिवाय, सभांमध्ये 500 जणांनाच उपस्थित राहता येऊ शकणार आहे. प्रचारावेळी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून करोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रचारावर विविध निर्बंध घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.