-डॉ. दिलीप गरुड
आज आचार्य विनोबा भावे यांच्या जन्माला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. 87 वर्षांचे समृद्ध आयुष्य ते जगले. महात्मा गांधीजींचे नाव उच्चारले की सोबत विनोबांच्या नावाची आठवण येते. मात्र, आजच्या काळाच्या संदर्भात विनोबांच्या जीवनकार्यातून कोणती प्रेरणा मिळते, हा विषय औत्सुक्याचा ठरतो.
आजच्या काळातही विद्यार्थी, शिक्षक आणि एकूण समाजाला प्रेरणा मिळावी अशा कितीतरी गोष्टी विनोबांच्या जीवनात पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे विनोबांची अध्ययनशील वृत्ती. विनोबा म्हणतात, “अध्ययन आणि अध्यापन केल्याशिवाय माझ्या जीवनातला एकही दिवस गेला नाही.’ आजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. विनोबा कथा-कादंबऱ्या वाचत नसत. ते संतसाहित्य, धर्मग्रंथ, वेद वाङ्मय यांचे वाचन करीत. तसेच रामायण, महाभारत, शंकरभाष्य, ब्रह्मसूत्रे, दर्शने, उपनिषदे यांचेही वाचन करीत. त्यातूनच त्यांना ब्रह्मचर्याची व सेवेची प्रेरणा मिळाली.
विनोबांनी चार भिंतींच्या आत शिक्षक म्हणून अध्यापन केले नसले तरी व्याख्यानांच्या निमित्ताने, प्रवचनांच्या रूपाने त्यांनी समाजाचे अध्यापन केले, असे म्हणता येईल. शिक्षणशास्त्र हा विनोबांचा आवडीचा विषय. त्यावर त्यांनी सखोल चिंतन तर केलेच; पण प्रसंगपरत्वे शिक्षकांना मार्गदर्शनही केले. त्यातूनच त्यांचा शिक्षणविचार उदयास आला. भूदान चळवळीच्या निमित्ताने त्यांनी 13 वर्षे भारतभर भ्रमण केले. एका गावाहून दुसऱ्या गावाला अशी ही पदयात्रा चालली. या पदयात्रेत विनोबांनी गावकऱ्यांपुढे विचार मांडले. त्याला प्रवचनाचे रूप आले. यातून विनोबांनी समाजाचे अध्यापनच केले, असे म्हणता येईल.
विनोबा बहुभाषिक होते. त्यांना 22 भाषा बोलता येत होत्या. देशी भाषांबरोबर त्यांनी परदेशी भाषांचाही अभ्यास केला. एस्परॅंटो, जपानी तसेच अरबी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला होता. अलीकडे आपले विद्यार्थीही फ्रेंच, जर्मन, जपानी तसेच इंग्रजी भाषा शिकून परदेशात नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जातात. बहुभाषिक असणे ही आता काळाची गरज आहे. मात्र, विनोबा बहुभाषिक झाले ते त्या भाषेतील ज्ञान कळावे आणि विचार समजावेत म्हणून. त्यांचे अध्ययन आनंदप्रेरित होते, अर्थप्रेरित नव्हते. मात्र, अर्थार्जनासाठी परभाषा शिकणे यात चुकीचे काहीच नाही. उलट अनेक भाषा येणे हे कौशल्याचे काम आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात विनोबांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनातही भाग घेतला. त्यांना वेगवेगळ्या आंदोलनांत एकूण 4 वर्षे 9 महिने शिक्षा झाली. ती त्यांनी आनंदाने स्वीकारली आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपले योगदान दिले. म्हणजे त्या काळात देशाची जी मागणी होती, ती त्यांनी पूर्ण केली.
विनोबा हे गांधीजींच्या सहवासात आले आणि त्यांनी आश्रमीय जीवन स्वीकारले. या आश्रमीय जीवनात त्यांनी डोक्यावरून मैला वाहून नेणे, शेतीकाम, गोपालन, स्वच्छता, सूतकताई ही कामे केली. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते तर काम हे कामच असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. सबंध हयातभर ते गीतेचा कर्मयोग जगले. ते वृत्तीने सेवक होते, पण प्रसंगपरत्वे त्यांनी लेखनही केले आहे. त्यांची “गीताप्रवचने’ तुरुंगात प्रसवली. “गीताई’चे प्रकाशनही धुळ्याच्या तुरुंगात झाले.
“मधुकर’, “भागवतधर्म-सार’, विचार-पोथी’, “नाम-माला’, “गुरूबोध-सार’, “स्त्री-शक्ती’, “धर्मामृत’, “सर्वोदय विचार’, “जीवनदृष्टी’, “साहित्यदृष्टी’, “कुराण-सार’, “अष्टादशी’, “विष्णूसहस्रनाम’, “महागुहेत प्रवेश’, “तिसरी शक्ती’ ही त्यांची काही अभ्यासणीय पुस्तके आहेत. ही पुस्तके वाचल्यानंतर विनोबांचा अभ्यास आणि चिंतन किती सखोल होते याची प्रचिती येते. अभ्यासकांनी, संशोधकांनी ही गोष्ट विशेष लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नसतानाही विनोबा “आचार्य’ झाले. आचार्य म्हणजे स्वतः चांगले आचरण करून समाजालाही तसे आचरण करायला लावणारा.
विनोबांची भारताला मोठी देण म्हणजे त्यांची भूदान चळवळ. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ती त्यांच्याकडून प्रेमाने, हृदयपरिवर्तन करून घेणे व ती भूमिहिनांना वाटणे. हा सारा प्रेमाचा कार्यक्रम होता. विनोबांची ही भूदान चळवळ 13 वर्षे चालली. सूर्याच्या साक्षीने आणि सूर्याइतक्याच नियमितपणे ती चालली. त्यासाठी विनोबांना 80 हजार किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. त्यातून त्यांना स्वखुशीने 43 लाख एकर जमीन मिळाली. जगाच्या दृष्टीने हा एक क्रांतिकारक प्रयोग होता. माणसाच्या मनात जसा द्वेष, मत्सर असतो तसा त्यागही असतो. दातृत्वही असते. विनोबांनी प्रेमाने माणसाच्या दातृत्वाला साद घातली आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे जमीन दिली.
विनोबा हयातभर ब्रह्मचारी राहिले. त्यांनी स्वतःचा संसार मांडला नाही, तर देशाचाच संसार केला. समर्थ रामदास, आद्य शंकराचार्य आणि गौतम बुद्ध हे त्यांचे आदर्श होते. या तिघांच्या पावलावर पाऊल ठेवून विनोबांनी वयाच्या विसाव्या वर्षी घर सोडले ते कायमचेच. ते ब्रह्माच्या शोधार्थ घराबाहेर पडले आणि भारतीय जनतेत त्यांना ब्रह्म सापडले. त्या ब्रह्माचीच त्यांनी हयातभर सेवा केली. विनोबा म्हणतात, “माणसाची तीन भाग्ये आहेत. ती भाग्ये म्हणजे मनुष्यजन्म लाभणे, सत्संग लाभणे आणि मोक्षाची ओढ लागणे. मला ही तीनही भाग्ये लाभली. मला मनुष्यजन्म लाभला याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. मला गांधीजींचा सत्संग लाभला आणि बालवयापासूनच मला मोक्षाची ओढ होती. म्हणूनच मी घरदार सोडले आहे. असे हे भाग्यशाली विनोबा.
गीतेचे अभ्यासक, गांधीजींचे सत्याग्रही, निष्कलंक, ब्रह्मचारी, थोर स्वातंत्र्यसेनानी, आचार्यकुलाचे जनक, भूदान चळवळीचे प्रवर्तक, बहुभाषिक, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, त्यांचे समग्र जीवन हा ऊर्जास्रोतच आहे. 125व्या जयंतीनिमित्त विनोबांना विनम्र अभिवादन.