मुंबई – महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, महाराष्ट्रातील इतर पक्ष आणि आमचे आघाडीचे घटक पक्ष एकत्र बसून हळूहळू लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या वाटपात बैठक बोलावून चर्चा करणार आहोत. या बैठकीतून अधिक चांगला समन्वय महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवून एक ठाम पर्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.
जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकमध्ये नुकत्याच ज्या निवडणूका झाल्या त्या निवडणुकीत भाजपचा प्रचंड मोठा पराभव झाला आहे. आज महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर पार पडलेल्या बैठकीत कर्नाटक निवडणूकांचा आढावा घेण्यात आला. या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, वेगवेगळ्या एजन्सीचा गैरवापर आणि स्थानिकदृष्टा जनतेला आलेले त्या सरकारच्या अनुभवावर चर्चा करण्यात आली.
महाविकास आघाडी म्हणून नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बसून साधतबाधत चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्याबाबतीत पुढे कोणकोणत्या गोष्टी करता येतील याची चर्चा करण्यात आली. अध्यक्षांना आता जबाबदारी सर्वोच्च न्यायलयाने दिली आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
महाविकासआघाडीची सकारात्मक चर्चा झाली, सर्वानुमते चर्चा करण्यात आली. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही सर्व एकत्र आहोत. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकासआघाडीचा मोठा विजय होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एकसंघपणाने सध्या उन्हाळा प्रचंड प्रमाणात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठका थोड्याशा प्रलंबित ठेवलेल्या आहेत. थोडासा उन्हाळा कमी झाल्यानंतर जुन महिन्यात पाऊसमान बघून आम्ही पुढच्या सभादेखील सुरू करणार आहे. जर पाऊसमान वाढल्यास मग काही ठिकाणी इनडोअर सभा घ्यायला लागतील. पण पाऊसमान आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित केलेली वज्रमूठ सभा थोड्या दिवसांनी पुन्हा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
लोकशाहीत आयाराम, गयारामांना काहीच महत्त्व नसतं. या सरकारचा थोडाच जीव बाकी आहे. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही. पक्षापेक्षा कोणी मोठा नाही अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने माडंली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाच विजय होणार आहे.
– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष