राजगुरूनगर/आंबेठाण -चाकण येथे कामासाठी आलेले मध्य प्रदेशातील सुमारे 100 कामगार आपल्या गावाकडे निघाले आहेत. प्रवासी वाहतूकसेवा बंद असल्याने त्यांच्यावर पायी जाण्याची नामुष्की ओढावली आहे.
चाकणमध्ये मार्बल काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील 100पेक्षा जास्त कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. हे कामगार 16 मार्च रोजी मध्यप्रदेशातून चाकण येथे कामासाठी आले होते.
चाकण कामगार नाक्यावरून ते मार्बलच्या कामासाठी रोजंदारीवर चाकण एमआयडीसीत कामाला जात होते. सुरुवातीला राज्यात संचारबंदी लागली त्यानंतर 25 मार्चपासून देशात संचारबंदीसह लॉकडाऊन सुरू झाल्याने चाकण एमआयडीसीत काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राहणे आणि जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे तर नाहीतच उलट ते राहत असलेल्या खोल्या खाली करण्यासाठी मालकांनी सांगितल्याने त्यांच्या पुढे मोठे प्रश्न उभे राहिले आहे.
कामही नाही आणि आता एका एका खोलीत राहणारे आठ दहा भैये आता हवालदिल झाले आहेत. त्यांच्या गावाकडे जायला वाहने, रेल्वे नसल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उपासमारी, राहण्याला आधार नसल्याने कामासाठी आलेले उत्तर प्रदेश, बिहारी, मध्यप्रदेश आदी राज्यातील हे कामगार आता पायी गावाकडे निघाले आहेत. दरम्यान मध्यप्रदेशात पायी चालत जाणाऱ्या या कामगारांना खेड पोलिसांनी चहा नाष्ट्याची सोय करून दिली. त्यानंतर शहरातील सेवाभावी नागरिकांनी जेवणाची व्यवस्था करून दिली आहे.
1200 किमी 15 दिवसांत कापणार
चाकण मध्ये टेल मार्बलमध्ये काम करणारे मध्यप्रदेशातील मुरेना गावामधील तब्बल 100 जणांनी आज पायी चालत मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला. चाकणमधून दुपारी 4 वाजता त्यांनी आपल्या गावाकडील रस्ता धरला आहे.
स्थानिक नागरिकांडून पाणी, नाष्टा व जेवणाची सोय केली जात आहे.त्यांना त्यांच्या गावाला चालत पोहचायला तब्बल 15 दिवस लागणार आहेत. सुमारे 1200 किमी रेल्वेने आलेल्या या कामगारांवर पुन्हा 1200 किमी अंतर पायी चालण्याची वेळ आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून त्यांचा पायी प्रवास सुरू झाला आहे.