भोपाळ – देशभरात सध्या टोमॅटोचे वाढते दर चर्चेचा मुद्दा झाला आहे. 20 रुपये किलो मिळणारे टोमॅटो 150 रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त महाग झाले आहेत. टोमॅटोचे भाव ऐकून लोक त्यापासून दूर राहणे योग्य मानत आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या घरापासून दूर गेला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटो 200 रुपये किलोने विकला जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे टोमॅटोमुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नीने घर सोडले आहे. तर पती तक्रार देण्यासाठी पोलिसात पोहोचला.
टोमॅटोवरून पती-पत्नीमध्ये वाद –
मध्य प्रदेशातील शाहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेम्हौरी गावात टोमॅटोवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. संजीव कुमार वर्मा नावाच्या व्यक्तीने भाजीत टोमॅटो टाकले, या गोष्टीचा पत्नीला एवढा राग आला की ती रागाने पतीचे घर सोडून निघून गेली. संजीव कुमार वर्मा ढाबा चालवतात आणि टिफिन सर्व्हिसचे काम करतात, असे सांगण्यात येत आहे. त्याने बायकोला न विचारता भाजीत टोमॅटो टाकला, ती रागावली आणि घरातून निघून गेली. पत्नीच्या शोधात संजीव कुमार यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नीला शोधण्यासाठी मदत घेण्यास सुरुवात केली. तसेच संजीवने पुन्हा कधीही टोमॅटो भाजीत वापरणार नसल्याची शपथ घेतली आहे.
पतीने सांगितले की, माझ्या पत्नीला टोमॅटो इतका महाग झाला असताना भाजीत का टाकला याचा राग आला त्यामुळे ती सोडून गेली. मुलीलाही सोबत घेऊन गेली आहे. असे संजीव यांनी सांगितले. संजीव यांनी भाजीत तीन टोमॅटो टाकले होते. त्यामुळे पत्नी रागावून कुठेतरी निघून गेली, अशी तक्रार आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी संजीव यांच्या पत्नीची समजूत काढली असून ती लवकरच घरी परतणार आहे.
दरम्यान, टोमॅटोच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे हा देशभरात चर्चेचा मुद्दा झाला आहे. सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही भाजीत टोमॅटोचा वापर करणे कठीण झाले आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या किंमती आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारने नाफेडद्वारे टोमॅटोची थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.