नगर – उद्धव ठाकरे यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे, तसाच परिणाम आमदार रोहित पवार यांच्यावरही झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीला रोहित पवार हे देखील जबाबदार आहेत, अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.
खास. विखे म्हणाले की, सध्या सरकार विकासकामांच्या माध्यमातून जनमत वळवत आहे आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे यांचे रोज एक शिलेदार त्यांना सोडून जात आहेत. त्यातून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ठाकरे यांच्याकडून अशी वाक्तव्य निघत आहेत. त्याचा आपण निषेध करतो.
आ. रोहित पवार यांनी दहा ते पंधरा दिवसात चित्र बदललेले दिसेल, सोडून गेलेले आमदार पुन्हा परततील असे वक्तव्य केले. त्याला प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले की जसा उद्धव ठाकरेंवर विपरीत परिणाम झाला आहे तसाच रोहित पवार यांच्यावर देखील झाला आहे. कारण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात रोहित पवार यांचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांची राष्ट्रवादीमध्ये ‘मोनोपोली’ होती. त्यामुळे सगळी अस्वस्थता आहे. ते जर म्हणत असतील आमदार परत येतील, मात्र ते येणार नाहीत आणि तोपर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊनही जातील.
राजकारणाचा चिखल झाला आहे, त्यामुळे युवकांनी राजकारणात येण्यापूर्वी विचार करावा, असे वक्तव्य आ. रोहित पवार यांनी केले. त्यासंदर्भात बोलताना खा. विखे म्हणाले की, त्यांनी युवकांना सल्ला देण्याआधी स्वतः राजकारण सोडावं, मग इतरांना सल्ला द्यावा. छगन भुजबळ, दिलीप वळसे यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी आमच्यासारख्या तरुण आमदार, खासदारांना विचार करावा, कारण आमच्या वयाइतका त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ राहिलेला आहे, याचा विचार करावा असाही टोला लगावला आहे.