कानपूर – मराठीमध्ये एक म्हण आहे.. “आधीच मर्कट; त्यात मद्य प्याला…’ वास्तवात खरोखरच असे झाले तर काय होईल, याची कल्पना करण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशातील एका गारुड्याकडे असलेल्या “मद्यपी’ माकडाला त्याने 250 जणांवर हल्ला केल्याबद्दल, आणि अशा हल्ल्यात एकाचा मृत्यु ओढवल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भारताच्या प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एखाद्या प्राण्याला अशी गंभीर शिक्षा ठोठावली जाण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.
मिर्झापूर जिल्ह्यातील एका गारुड्याने हे माकड, काळुआ नावाचे पाळले होते. साप-मुंगुस आणि माकडाचे खेळ करणारा हा दरवेशी त्या माकडाला दररोज दारु पाजत असे. तीन वर्षांपूर्वी हा दरवेशी मरण पावला. त्यानंतर सदर माकडाला पिण्यासाठी दारू मिळेनाशी झाली. त्यामुळे तो हिंस्त्र होत गेला. मग रस्त्यावरुन जाणाऱ्या माणसांवर तो हल्ले करु लागला. तीन महिन्यांच्या कालावधीत या माकडाने किमान 250 जणांवर हल्ले केले, ज्यामध्ये एका व्यक्तीला मरण ओढवले. तर अनेक जखमींना प्लॅस्टीक सर्जरी करावी लागली.
कानपूर प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यक मोहम्मद नासिर यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी काळुआला पकडल्यानंतर त्याला एकाकी बनविले होते परंतु त्यांनी आदीजीवाच्या आक्रमक वर्तनात कोणताही बदल दिसला नाही. प्राणीसंग्रहालयाने वेगवेगळ्या आहाराने काळुआला शांत करण्याची आशा केली होती. परंतु ते सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाने काळुआला आयुष्यभर वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.