मुंबई – जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आता मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. पोलिसांना लाठीचार्जचा आदेश हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीसांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला.
मात्र, मराठा आरक्षणाबाबत आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘जेव्हा राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा याचे राजकारण केले जाते, हे दुर्दैवी आहे.
मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजात गैरसमजत पसरवले जात आहेत. काही जणांकडून मंत्रालयातून लाठीमाराचे आदेश आले असल्याचा आरोप केला जातोय,
त्यांनी हे सिद्ध करून दाखवावे. शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन करण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि मराठा संघटनांना आरक्षणासाठी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार केले आहे.