मुलतान :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यातच या स्पर्धेच्या तिकिट विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे वृत्तही पाकिस्तानसह अनेक देशांतील दैनिकांनी प्रकाशीत केले होते. मात्र, नेपाळविरुद्धच्या पाकिस्तानच्या सलामीच्या लढतीत येथील स्टेडियम मात्र रिकामेच दिसत होते. त्यामुळे इतक्या मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदानंतरही पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे.
पाकिस्तानचा पहिला सामना नेपाळशी झाला. त्यात पाकिस्तानने 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विश्वविक्रम साकार केला. बाबारने या सामन्यात 151 धावांची अफलातून खेळी केली. तसेच इफ्तेखार अहमदनेही शतकी खेळी केली होती. मात्र, तरीही मुलतानचे मैदान जवळपास 70 टक्के रिकामेच होते.
मग तिकिट खिडकीवर हाऊसफुल्लचा फलक का लावला गेला असा सवाल आता चाहत्यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानच्या या स्पर्धेच्या आयोजनावरूनही प्रश्न निर्माण झाले आहेत.
पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर खेळत होता. मात्र, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला, त्या वेळी प्रेक्षकांची संख्या अत्यंत रोडावली होती. त्यामुळे पाकिस्तान संघाच्याच चाहत्यांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याची टीकाही सुरु झाली आहे.
जर हाच सामना भारतात खेळवला गेला असता तर मैदान तुडुंब भरले गेले असते असेही खुद्द समालोकांनीही म्हटले आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे का, याचा विचार आता आशिया क्रिकेट समितीला करावा लागणार आहे.