भारताचा माजी कसोटीपटू, समालोचक व सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक रविशंकर शास्त्री. त्याचा दिनांक 27 मे हा जन्मदिन. त्यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा घेतलेला हा धावता आढावा.
तंत्रशुद्ध क्रिकेट खेळत त्याने 80 कसोटीत 3 हजार 830 धावा जमवल्या व 151 बळी मिळवले. मर्यादित गुणवत्तेचा पुरेपूर वापर करून यश मिळवणाऱ्या या खेळाडूने 81-90 च्या दशकात भारतीय क्रिकेट रसिकांना आपली दखल घ्यायला लावली.
शास्त्री तसा नशीबवानच म्हणायला हवा, मुंबईत विद्यापीठ स्तरावर क्रिकेटमधून त्याला थेट मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळाले ते वयाच्या 18 व्या वर्षी. 1980 च्या रणजी अंतिम सामन्यात दिल्लीविरुद्ध सहा बळी मिळवत त्याने सुनील गावसकरचे लक्ष वेधून घेतले.
1980-81 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या जोड दौऱ्यावर होता. फिरकी गोलंदाज दिलीप दोशी जायबंदी झाल्याने शास्त्रीला तातडीने न्यूझीलंडला बोलावून घेण्यात आले आणि तो वेलिंग्टन कसोटीच्या आदल्या दिवशी तेथे पोहोचला.
शास्त्रीचा नशिबाचा भाग येथेच संपतो. त्यानंतरचे त्याने मिळवलेले यश त्याच्या जिद्दी वृत्तीचेच फळ म्हणावे लागेल. न्यूझीलंडच्या मालिकेत त्याने सर्वाधिक 15 बळी मिळवले.
गोलंदाज म्हणून संघात आलेला शास्त्री दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. मात्र, 1982 च्या इंग्लंड दौऱ्यात तो चक्क सलामीचा फलंदाज म्हणूनसुद्धा खेळला.
पाकिस्तान दौऱ्यात शेवटच्या कसोटीत सलामीला येऊन त्याने आपले पहिले शतक साजरे केले. 1983 च्या विश्वचषक विजयात त्याला प्रेक्षकाचीच भूमिका वठवावी लागली.
1985 ची ऑस्ट्रेलियातील बेन्सन हेजेस करंडकाची एकदिवसीय क्रिकेटची स्पर्धा मात्र शास्त्रींच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरली. या स्पर्धेत 182 धावा आणि एकूण 8 बळी या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब, तसेच ऑडी गाडी पटकावली.
1986 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला. त्या संघाविरुद्ध चेन्नईची कसोटी बरोबरीत (टाय) सुटल्याने ही मालिका गाजली.
348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर भारताची मधली फळी कोसळली आणि विजयासाठी दोन धावांची जरूर असताना मनिंदर हा शेवटचा खेळाडू समोर उभा होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रत्येक चेंडूवर जोरदार अपील करत होते.
शास्त्रीने एक धाव घेऊन भारत सामना हरणार नाही हे निश्चित केले आणि पुढच्याच चेंडूवर पंचानी मनिंदरला पायचीत ठरवले. 1987 मधील भारतातील विश्वचषक स्पर्धेत शास्त्रीने गोलंदाज म्हणून छाप पाडली.
शास्त्रीने कसोटीत एकूण 11 शतके ठोकली, त्यातील सात परदेशी भूमीवर होती. 1991-92 च्या ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च 206 धावा ठोकल्या त्या सिडनी येथे. 1992 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीची सांगता झाली.
शास्त्रीने कर्णधारपदाची महत्त्वाकांक्षा कधी लपवून ठेवली नाही, पण तो कायम कॅप्टन इन वेटिंगच राहिला. कपिलने एकदा टोमणा मारला की, दुल्हन तो सज धज के खडी तैयार है.
गॅरी सोबर्सनंतर सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारा तो त्या वेळपर्यंतचा दुसराच फलंदाज ठरला. बडोद्याच्या तिलक राजच्या गोलंदाजीवर त्याने हा पराक्रम केला. निवृत्तीनंतर त्याने समालोचक म्हणून नाव कमावले.
सध्या तो भारताचा एक यशस्वी मुख्य प्रशिक्षक आहे. तो पूर्णपणे व्यावसायिक वृत्तीचा असल्याने तो भावनाविवश न होता परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो. या गुणांमुळेच 36 धावांत गारद झालेला भारतीय संघ नाउमेद न होता ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात बाजी उलटवू शकला.
– रघुनंदन भागवत, पुणे