पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे इयत्ता दहावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के व त्याहून अधिक आणि बारावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यास अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगन्य असल्याची माहिती समोर आली आहे. योजनेची माहिती पात्रताधारक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती दिसत आहे. त्यामुळे अर्ज करण्याची 31 ऑक्टोंबरची मुदत आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळ व शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येणा-या शाळेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के व इयत्ता बारावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के गुण घेणा-या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे 10 हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यात येते. आणि इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत 90 टक्केहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये बक्षिस रक्कम दिली जाते. मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 17 जून 2022 रोजी आणि इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे विद्यार्थी बक्षीस योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यावर आजअखेर 80 ते 90 टक्के गुण घेणा-या इयत्ता दहावीच्या केवळ 291 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. दहावीच्या 90 टक्केहून अधिक गुण मिळविणाऱ्या अवघ्या 157 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, बारावीच्या 90 टक्केहून अधिक गुण घेणा-या निव्वळ 138 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या 10 हजाराहून अधिक आहे. संपूर्ण शहराचा विचार केला तर इयत्ता दहावी आणि बारावीची विद्यार्थी संख्या लाखांमध्ये आहे. त्यातील 80 ते 90 आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या हजारांमध्ये आहेत. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी बोटावर मोजण्याएवढ्या विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. यावरून विद्यार्थ्यांमध्ये योजनेबाबत जनजागृती नसल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने विद्यार्थी बक्षीस योजनेची जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विद्यार्थी बक्षीस योजनेसाठी पात्रता धारण करणा-या विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले. इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर उच्चशिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरुच आहे. तरीही, विद्यार्थ्यांचा योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज करता यावेत, यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुहास बहादरपुरे, समाजविकास अधिकारी, नागरवस्ती विभाग