सकृतदर्शनी पाहता एलआयसीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आहे. आता पुढे गुंतवणूकदारांनी काय करावे? पुढे नव्याने गुंतवणूक करावी की नाही? त्याबाबत…
पै पै प्रीमियमने सुरक्षा घेणाऱ्यांनी
एकगठ्ठा रकमेचे शेअर्स काढले
पै पै ने गुंतवणूक कमी पाहताना
कित्येकांचे तर ब्लडप्रेशर वाढले
सदरची चारोळी एलआयसीचे शेअर्स मार्केटवरती वा शेअर बाजारात नोंदणी झाल्यावर लिहिली होती. एलआयसीने शेअर विक्री 949 दराने ठरवली होती. सामान्य गुंतवणूकदारांसाठी 45 रुपये सूट देऊन त्यांना 904 तर पॉलिसीहोल्डरसाठी खास 60 रुपये प्रत्येक शेअरला सूट देऊन 889 रुपयांना शेअर विकला. 20 तारखेला शेअर बाजार बंद होत असताना एलआयसी शेअर 826 रुपयांच्या आसपास बंद झाला. बाजारात नोंद झाल्याच्या दिवशी गुंतवणूकदारांचे सुमारे 46 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता हे नुकसान का झाले म्हणजे शेअर भाव कमी का झाला, याला अनेक कारणे आहेत. मुळातच आपला शेअर बाजार करोनामुळे अस्थिर होता. करोनानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. पेट्रोलियम पदार्थ, लोह, खाद्यपदार्थ, खाद्यतेल, सिमेंट पायाभूत वस्तूंच्या किमती वाढू लागल्या. म्हणूनच शेअर बाजारात मंदीचे सावट दिसते.
अलीकडे मोठ्या कंपन्यांनी गाजावाजा केलेले पब्लिक इश्यू फ्लॉप ठरले असून गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. एलआयसीच्या बाबतीत सांगायचे, तर त्याचे गुंतवणूकदार किंवा पॉलिसीहोल्डर हे बरेचसे मध्यम किंवा वयस्कर असेच लोक जास्त आहेत व त्यातील कित्येक जणांनी कधीही शेअर बाजारात पैसा टाकलेला नाही. आपण पाहिले असेल की एलआयसीचा इश्यू येण्याच्या कितीतरी अगोदर मोठा गाजावाजा झाला होता. सर्वांनी डीमॅट खाते काढून घ्यावे, अलीकडे अनिवार्य आहे म्हणून कित्येक एजंटांनीही आपल्या पॉलिसीहोल्डर्सना तसे करायला सांगितले. काही एलआयसी एजंट देखील सब ब्रोकर झाले आणि नवीन डीमॅट खाती निर्माण झाली. आता एलआयसीने शेअर 949 रुपयाला विकला व नंतर तो खाली आला आहे हे वास्तव आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल ही 949 किंमत आली कुठून? इथेच तर खरी मेख आहे.
भांडवल बाजार नियंत्रक म्हणून “सेबी’कडे पाहिले जाते. पूर्वी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज (सीसीआय) म्हणून एक संस्था होती. नवीन इश्यू काढायचा किंवा नवीन शेअरची किंमत काय ठेवायची, यासाठी त्यांचे काही ठोकताळे होते. थोडक्यात सांगायचे, तर बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीकडे असलेली एकूणच मालमत्ता ज्यात शेअर होल्डर्सचाही पैसा आहे अशी सर्वांची बेरीज करून एकूण जेवढे शेअर्स आहेत त्याने त्याला भागले असता एका शेअरचे किती मूल्य येते त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात. कंपनीची उलाढाल किती आहे, कंपनीला नफा किती आहे, प्रत्येक शेअरवर किती कमाई होते किंवा तशा प्रकारच्या इतर कंपन्या आहेत त्यांचे सध्या प्रॉफिट मार्जिन काय आहे म्हणजे भविष्यात या कंपनीचे काय होईल याचा एक अंदाज येत असे. त्याप्रमाणे सीसीआय त्यांना शेअर वरती प्रीमियम ज्याला अधिमूल्य म्हणता येते ते घ्यायची परवानगी देत असे व त्या शेअरची विकण्याची किंमत ठरत असे. त्यातही थोडं मध्ये काही गडबड झाली असल्यामुळे पुढे सीसीआय बंद होऊन सेबी आली. सेबी आल्यापासून हे सर्व मोडीत निघाले असून आता त्याला मुक्त मूल्य वा फ्री प्रायसिंग अशा रीतीने जी कंपनी इश्यू काढणार आहे त्यांचे मर्चंट बॅंकर असे मूल्य निश्चित करतात.
मोठा गाजावाजा करून पेटीएमने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपला मोठा आयपीओ आणला होता. जवळजवळ 18 हजार कोटी जमा केले. त्यातले 8 हजार कोटी रुपयांचे नवीन शेअर होते आणि 10 हजार कोटी प्रवर्तक त्यांचे भाग भांडवल विकणार होते. त्या शेअरची किंमत 2,150 ठरवली होती, तो झाल्यानंतर तो कधीच तेवढा पोहोचला नाही व आता जेमतेम पाचशे किंवा साडेपाचशे ते सहाशे रुपयांच्या आसपास घोटाळत आहे. कंपनीला शेवटच्या चार महिन्यांत 690 कोटींपेक्षा जास्त तोटा झालेला आहे व वर्षभराचा तोटा 2,300 कोटींच्या आसपास आहे. मग 2,150 रुपयांनी शेअर कोणत्या निकषावर वाटले गेले? बरं त्यात पेटीएमच्या खात्यात 8 हजार कोटी गेले व 10 हजार कोटी प्रवर्तकांनी आपले शेअर 2,150 नी विकले. म्हणजे आज तेच प्रवर्तक 25 टक्के भावाने पुन्हा मार्केटमधून डमी वापरून शेअर घेऊ शकतात. मग यात सर्वसामान्य लोकांचा पैसा बुडाला नाही का? असे अनेक इश्यू सांगता येतील उदाहरणार्थ, झोमॅटो व इतरही.
आज एलआयसीचा सर्वात मोठा इश्यू सक्सेस जरी झाला असला, तरी त्यातून एलआयसीला एक पैसाही मिळालेला नाही, हे किती जणांना माहीत आहे? याचे कारण शंभर टक्के केंद्र सरकारचे एलआयसीमध्ये भागभांडवल होते व त्यातील साडेतीन टक्के फक्त केंद्र सरकारने विकलेले आहेत. हा सर्व पैसा जो वीस-एकवीस हजार कोटी रुपये जमा झाला तो केंद्र सरकारच्या खात्यात गेलेला आहे. म्हणूनच एकंदरीत आयपीओच्या बाबतीत सरकारने यामध्ये आयपीओच्या किमतीवर काहीतरी गणित आणणे आवश्यक आहे. अर्थात भारतीय भांडवल बाजार हा असा आहे की जो सट्टेबाजीवर जास्त चालतो व मूलभूत किंवा ज्याला आपण पायाभूत कंपनीची परिस्थिती आहे त्याकडे जरा कमीच बघतो. म्हणून तर कित्येक चांगल्या कंपन्या कमी भावाने मार्केटमध्ये ट्रेड होतात तर कित्येक कवडीमोल दर्जाच्या कंपन्या जास्त भावाने बाजारात वावरत आहेत.
एलआयसीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांनी एकदमच हाताश होण्याचे कारण नाही. म्हणजे सध्या तर पैसे कमी झालेले आहेत परंतु भाव जर अजून कमी आठशेच्या आसपास गेला व पुन्हा वाढू लागला तर अजून काही शेअर्स घेऊन आपण सरासरी भाव कमी करून घ्यावा. एलआयसी खूप मोठी कंपनी असून कित्येक कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. मुंबई बाजाराच्या सेन्सेक्समध्ये असलेल्या बहुतेक कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीमधल्या कित्येक कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक असून त्याप्रमाणे तिला परतावा मिळत आहे. भविष्यात पुन्हा एलआयसीचा इश्यू येण्याची शक्यता आहे. कारण एकदा बाजारात नोंद झाल्यावर 25 टक्के भागभांडवल प्रवर्तकांना इतर गुंतवणूकदारांना द्यावे लागते, हा नियम आहे. अर्थात, सरकारी कंपन्यांना थोडी त्यात सूट आहे. पण आज ना उद्या पुन्हा एलआयसीचे शेअर्स कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाजारात येतील हे नक्की.