मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे सदर बैठकीत लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यासंदर्भात, तसेच झोननिहाय व्यवहार सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन संदर्भात सर्व नेत्यांचे एकमत झाल्याचे चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत वृत्त आले नाही. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.
तसेच कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे मंत्रालयात सादर केला होता. तज्ज्ञगटाच्या या अहवालात सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर आज बैठकीत विचार विमर्श करण्यात आला.