लखनौ – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून त्याचा आज तेरावा दिवस आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता २१ दिवसांचा लॉक डाऊन आणखी वाढवला जातो काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रश्नास उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी स्पष्ट उत्तर दिलं असून, आपण सध्या लॉक डाऊन उठवण्याच्या परिस्थितीमध्ये नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
याबाबत एका नामांकित वृत्त संस्थेने माहिती दिली असून अवस्थी यांना १४ तारखेस लॉक डाऊन संपुष्टात येईल काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, “उत्तर प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक असल्यास आपण लॉक डाऊन उठवण्याच्या परिस्थितीमध्ये नसू” असं सांगितलंय.
दरम्यान अवस्थी यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देशातील लॉक डाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत स्पष्ट मत मांडल्याने देशातील कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रांमध्ये लॉक डाऊन कायम ठेवला जाण्याची शक्यता बळावली आहे. असं असलं तरी सरकारतर्फे याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही.