सातारा – झाडे जगली पाहिजेत आणि पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी “आम्ही हवी ती झाडे तुमच्या जागेत लावून देऊ. तुम्ही ती जगवा, त्या झाडांचे मालक व्हा आणि फळे चाखा,’ या अभिनव उपक्रमांतर्गत परमाळे (ता. सातारा) येथे माणसी एक अशी 650 फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी झाडे जगवा आणि त्या झाडाची फळे चाखा आणि त्याद्वारे निसर्ग संवर्धन करा, असा मोलाचा संदेश सौ. वेदांतिकाराजे यांनी दिला.
कर्तव्य सोशल ग्रुपच्या या प्रकल्पाचा गेल्यावर्षी शेळकेवाडी येथून प्रारंभ झाला. परमाळे हे या उपक्रमातील पाचवे गाव ठरले असून कर्तव्य सोशल ग्रुपने गावातील लोकसंख्येनुसार प्रत्येकाला हवे ते झाड मोफत दिले. यामध्ये कलमी आंबा, चिकू, पेरू, नारळ आदी फळझाडांचा समावेश आहे.
सौ. वेदांतिकाराजे भोसले, शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष बाजीराव कदम, अशोक कदम (फौजी), सरपंच सुमन कदम, उपसरपंच जयसिंग कदम, माजी सरपंच हणमंत कदम, संपतराव कदम, आनंद कदम, रामदास कदम, संतोष कदम, शुभांगी कदम, वैजयंता कदम, वैष्णवी कदम, वाघजाई माता सांस्कृतिक मंडळ, गणेशोत्सव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. तसेच सर्वांनी मास्क परिधान केला होता.
वेदांतिकाराजे म्हणाल्या, “दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, शासन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण होते. मात्र, संवर्धन आणि देखभाल न झाल्याने ही झाडे जगत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळेच कर्तव्य सोशल ग्रुपने झाडांचे संवर्धन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मोफत झाडे देऊन ती लावण्याचा निर्णय घेतला. फक्त लावलेले झाड ग्रामस्थाने जगवले पाहिजे, अशी अट आहे. लावून दिलेल्या झाडाचे मालक व्हा आणि त्या झाडाची फळे खा, फक्त झाडे जगवा आणि निसर्गाचे रक्षण करा या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे.’