साहित्यावर आधारित चित्रपट निर्मिती करणे हा नवीन ट्रेंड नाही. बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही दर्जेदार कथा-कादंबऱ्यांवर चित्रपट तयार करणे हे निर्मात्याचे आवडीचे काम. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गॉडफादर चित्रपट. या चित्रपटाने आणि कादंबरीने इतिहास घडवला आहे. अर्थात, असे उदाहरण अपवादात्मक आढळून येते. बॉलीवूडचा विचार केल्यास हिंदी साहित्यिकांच्या कथांवर चित्रपट साकारले, परंतु प्रत्येकालाच यश मिळाले असे नाही. त्याचवेळी पाश्चात्य चित्रपटावरून हिंदीत चित्रपट आणले गेले, परंतु त्यातही काही जण तोंडावर आपटले. अशा स्थितीत परदेशातील कादंबऱ्यावरही चित्रपट काढले गेले, मात्र ते फारसे समाधानकारक ठरले नाही. कारण कादंबरीचे पटकथेत रूपांतर करणे हे सोपे नाही. हे रसायन सर्वांनाच जमते असे नाही. म्हणून बरेच जण साहित्यावर आधारलेले चित्रपट काढण्याच्या फंदात पडत नाहीत.
हिंदी दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी चार्ल्स डिकेन्सच्या द ग्रेट एक्स्पेक्टेशनवर आधारित “फितूर’ची निर्मिती केली. मात्र, पुढे त्यांना पश्चाताप झाला. त्यानंतरचा केदारनाथही आपटला. तरीही फितूर चित्रपटातील नायिका कतरिना कैफला “द ग्रेट एक्स्पेक्टेशन’ खूप आवडला होता. यादरम्यान तिने कादंबरीवर आधारित चित्रपट करू इच्छित असल्याचे सूतोवाच केले होते. काही वर्षापूर्वी चेतन भगतची लोकप्रिय कादंबरी “द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’वर अभिषेक कपूर यांनी “काय पो चे’ निर्मिती केली होती. या चित्रपटातील दर्जेदार स्क्रिप्टींगचे नेहमीच कौतुक झाले आहे. मात्र कतरिना कैफने या स्क्रिप्टींगसाठीही दिर्ग्शकाला खूप पळवले. मात्र, फितूरचे काय झाले, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
ऐश्वर्या आणि इरफानचा जज्बा हा इंग्रजी कादंबरीवर आधारित होता. तत्पूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी एस. हुसेनी झैदीचे पुस्तक डोंगरी टू दुबई यावर आधारित शूटआऊट ऍट वडाला काढला होता. असे असले तरी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मागणी ही चेतन भगतला राहिली. त्यांच्या जवळपास सर्वच कादंबऱ्यावर चित्रपटाची निर्मिती झाली आहे. हाफ गर्लफ्रेंडवर मोहित सुरी आणि एकता कपूर यांनी चित्रपट तयार केला. मात्र तो पडला. त्यापूर्वीचा टू स्टेटसने चांगला व्यवसाय केला. दुसरीकडे नव्या दमाचे दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांनी व्योमकेश बक्षी काढला. तो सत्यजित रे यांच्या काही लघुपटांवर आधारित होता. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा अस्सी मोहल्ला चित्रपट हा साहित्यिक डॉ. केदारनाथ सिंह यांची कादंबरी काशी का अस्सी यावर आधारित होता. आमीर खानचा चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्थान देखील फिलिप मिडोज टेलरची कादंबरी “कॉनफेशन ऑफ ठग’वर आधारित होता.
सुपरहिटची हमी नाही
लोकप्रिय कथा आणि कादंबऱ्यांकडे अलीकडच्या काळात निर्मात्यांचे लक्ष वाढले आहे. मात्र, बेस्टसेलर पुस्तकावरचा चित्रपट हा तिकीटबारीवरही यशस्वी ठरेल, याची हमी देता येत नाही. यासाठी आपण काही अलीकडच्या चित्रपटाचे उदाहरण घेऊ. काही वर्षापूर्वीच रस्किन बॉंड यांच्या कादंबरीवर आधारित विशाल भारद्वाज यांनी “सात खून माफ’ काढला, मात्र त्याची स्थिती फारच वाईट झाली. विशाल हे बहुचर्चित विषयावर चित्रपट काढण्यास प्रसिद्ध निर्माते मानले जातात. त्यांचे चित्रपट ओमकारा-ओथेलो, मकबूल-मॅकबेथ आणि हैदर-हमलेटवर आधारित होता. मानिनी चॅटर्जी यांची इंग्रजी कादंबरी “डू ऑर डाय’ वर आधारित आशुतोष गोवारीकर यांचा “खेलेंगे जी जान से’ हा काहीच चालला नाही. परंतु हा चांगला चित्रपट होता.
स्क्रिप्टचे आव्हान
दिवंगत शक्ती सामंतने आराधना, अमर प्रेम, अमानुष, आनंद आणि आश्रम यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आराधनानंतर त्यांची दिशाच बदलून गेली. ते आपल्या चित्रपटासाठी बंगालच्या साहित्यावर अधिकच मेहरबान झाले होते. अर्थात, ते यशस्वी देखील झाले. कारण ते चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अधिक लक्ष देत होते. यासाठी ते प्रसिद्ध साहित्यिक कमलेश्वर यांची मदत घेत होते. तसे पाहिले तर शक्ती सामंताबरोबरच विमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी यासारखे दिग्दर्शक स्क्रिप्टमध्ये योगदान देऊनही त्याच्या लेखनापासून दूर राहात असत. याबाबतीत त्यांनी नेहमीच तज्ज्ञ मंडळींचाच आधार घेतला आहे. पुनर्जन्मावर आधारित सुपरहिट चित्रपट “मधुमती’चे संवाद लेखन ऋत्विक घटक यांनी केले होते. अलीकडेच ऋत्विक घटकचे सहायक ऋषी जेना यांनी प्रेमचंद यांची कहानी “कफन’वर आधारित याच नावाने चित्रपट तयार केला. राजपाल यादव आणि नेत्रा रघुरामन यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली. टॉकीजवाले श्रोत्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत राहिले. यामागचे प्रमुख कारण म्हणजे स्टार कास्ट. तसेच वितरकांकडे या चित्रपटासाठी वेळही नव्हता.
आपल्याकडे साहित्याचा भांडार
अभिनेता नाना पाटेकर यांनी कादंबऱ्यावर पुरेशा प्रमाणात चित्रपटाची निर्मिती होत नसल्याबद्दल निर्मात्यांनाच जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, आपल्याकडे संपन्न साहित्याचा वारसा आहे. मात्र, त्यांची या साहित्यावर फारशी नजर जात नाही. मी मराठी माणूस आहे. मराठीनंतर हिंदीबाबत विचार करतो. इंग्रजीचा विचार केला तर ते मी अचूकपणे बोलूही शकत नाही. मात्र मराठी असो किंवा हिंदी आपल्याकडे मुबलक साहित्य आहे. आपल्याकडे एखाद्या दिग्दर्शकाची नजर जेव्हा साहित्याकडे जाईल, तेव्हा माझा पूर्ण पाठिंबा असेल. असो, आज व्यावसायिक सिनेमांनी साहित्याला दूर लोटले असेल तरी कालांतराने साहित्याचा आधार घ्यावाच लागणार आहे. अलीकडच्या काळात सुमार चित्रपटांमुळे श्रोत्यांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे दर्जेदार साहित्यावर चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. साहित्यावर आधारित चित्रपटाच्या अपयशाचा विचार केल्यास बहुतांश निर्माते हे चांगल्या कथानकाची गरज बोलून दाखवतात. यासंदर्भात दिग्दर्शक मनोजकुमार यांचे म्हणणे लक्षात घ्यायला हवे. जेव्हा आमचे सहकारी निर्माते एखाद्या साहित्य कलाकृतीशी छेडछाड करतात तेव्हा ती बाब चुकीची ठरते. त्यामुळेच कादंबरीवर चित्रपट तयार करताना लेखकालाही विश्वासात घेणे हे तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
भन्साळी काय म्हणतात?
“पद्मावत’नंतर भन्साळी यांचा नवीन चित्रपट इन्शाल्लाह हा एका प्रसिद्ध कादंबरीवर आधारित येत आहे. त्यांनी मागील चित्रपटाप्रमाणेच याही कथानकात मोडतोड केली आहे. कथानकाशी छेडछाड करताना टीकाकारांना सामोरे जावे लागते, ही बाब ते नाकारत नाहीत. जर एखाद्याच्या साहित्यकृतीत बराच बदल केला असेल तर टीकाकार आणखीच तावातावाने बोलत असतात. देवदासनंतर माझ्यावर अशाच प्रकारचे आरोप झाले, असे भन्साळी म्हणतात. शरत बाबूच्या साहित्यकृतीशी मी खूप छेडछाड केली, असे टीकाकारांनी मत मांडले. अर्थात दिग्दर्शक या नात्याने पटकथेत बदल करण्याचा मला अधिकार आहे, असेही भन्साळी म्हणतात. शरतचंद्र यांच्या कादंबरीचे मी अनेकदा वाचन केले आहे. मात्र, देवदासला ज्या रूपातून पाहिले आणि अनुभवले तेच मी साकारण्याचा प्रयत्न केला. आजच्या संदर्भाशी मिळतेजुळते ते पात्र निर्माण केले. त्यामुळे मला कथानकात बदल करावे लागले.
वाचणे आणि पाहण्यातील फरक
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट हे पुस्तक किंवा साहित्यावर चित्रपटाची फारशी निर्मिती करत नाही. एखादा कादंबरीवर आधारित चित्रपट आपटल्यास त्याचा संपूर्ण दोष हा स्क्रिप्टचा असतो. ते म्हणतात, की वाचणे आणि पाहणे यातील फरक आपण विसरतो. अशी अनेक पुस्तके असतात की ते वाचनाला रंजक वाटतात. मात्र, त्याच्यावर चित्रपट बनवण्याचा मोह मला कधीही झाला नाही. कारण चित्रपट तयार करताना त्या कथानकाचे स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागतो. अर्थात या गोष्टी लेखकाला आवडेलच असे नाही. ही बाब काही अंशी खरी असली तरी यातून अनेक वाद निर्माण झालेले आहेत. एखादा चित्रपट सुमार दर्जाचा झाल्यास लेखक हे निर्मात्यावर साहित्याचा कचरा केल्याचा आरोप करतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजकुमार हिरानीचा सुपरहिट चित्रपट थ्री इडियट. चेतन भगत यांची कादंबरी “फाईव्ह पॉंइट समवन’वर हा चित्रपट बेतलेला होता. प्रदर्शनानंतर चेतन भगत यांनी निर्मात्यावर खुलेआम आरोपाच्या फैरी झाडल्या. या कथानकात केवळ बदल केला नाही तर त्याचे श्रेयही दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.
सोनम परब