निगडी, (वार्ताहर) – महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प नरेंद्र आमले आणि उमेश घळसासी यांनी केलेल्या प्रभावी अभिवाचनाने गुंफण्यात आले.
विधान परिषद आमदार उमा खापरे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश मोरे, उद्योजक बसवराज कोळी, श्रीकांत करोळे, सुनील कदम, सुजीत साळुंखे, महेश पवार, बाजीराव चासकर, दिलीप जाधव, महेश पवार, सुदर्शन आहेर, गोपीचंद जगताप तसेच केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे उपस्थित होते.
रंगमुद्रा थिएटर प्रस्तुत योगेश सोमण लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या चरित्रपर साहित्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काळपुरुषाशी केलेल्या संवादातून आपला जीवनातील ठळक आठवणी उलगडून सांगत आहेत, अशी विलक्षण कल्पना मांडली होती.
आपले जीवितकार्य सफल झाले आहे म्हणून कृतकृत्य होऊन सावरकरांनी 1 फेब्रुवारी 1966 रोजी प्रायोपवेशन व्रत स्वीकारले. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे पंचप्राण पंचतत्वात विलीन झाले. या सव्वीस दिवसांच्या कालावधीत मृत्यू त्यांच्याशी हितगुज करीत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी चापेकर बंधूंच्या हौतात्म्यामुळे अस्वस्थ झालेल्या विनायकाने शत्रूशी मारता मारता मरेपर्यंत झुंजेन ही केलेली प्रतिज्ञा, मित्रमेळावा, 1 जानेवारी 1900 रोजी स्वातंत्र्यलक्ष्मीचा केलेला जयघोष, विदेशी कपड्यांची होळी, अभिनव भारतची शपथ,
लंडन येथील इंडिया हाउसमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रात्यक्षिक, 21 पिस्तुले हिंदुस्थानात धाडण्याची योजना, स्वातंत्र्य कार्यात सहभागी झाल्यामुळे संपूर्ण सावरकर कुटुंबाची झालेली वाताहत, ने मजसी ने परत मातृभूमीला…, मार्सेलिसची उडी, वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी दुसर्या जन्मठेपेची अभूतपूर्व शिक्षा, सेल्युलर जेलमधील नरक यातना, तेथे बाबाची झालेली भेट,
अस्पृश्यांच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकरांना पाठिंबा, पतितपावन मंदिराची स्थापना, अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन कार्य, ब्रिटिशांकडून बिनशर्त सुटका, गांधीजींनी सुटकेवर पाळलेले मौन, एकसंध हिंदुस्थानचे स्वप्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट, देशाच्या सीमांचे संरक्षण करावे म्हणून राष्ट्रपतींना पाठवलेले पत्र, भारतीय वक्तृत्वाचा महामेरू, आत्मार्पण अशा घटनांची मालिका अभिवाचनातून उलगडत गेली.