अरुण गोखले
गावातील राममंदिरातील कीर्तन महोत्सवाचा तो शेवटा दिवस. समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांवर चाललेले ते कीर्तन. बुवा मोठ्या पोटतिडीकेने श्रोतृवर्गास सांगत होते की “”बाबांनो! एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर जग जिंकायचे असेल तर आधी तुम्ही तुमचे मन जिंका. कारण मन जिंकी तोच जग जिंकी.”
मानवी जीवनातील मनाचे महत्त्व लक्षात घेऊनच द्रष्ट्या समर्थांनी इतर कोणालाही उपदेश न करता तो फक्त मानवी मनालाच केला आहे. “मनाचे श्लोक’ ही मानवी मनालाच दिलेली दिव्य शिकवण आहे. माणसाचे मन चंचल आहे, माणसाचा मानव घडायचा की दानव हे सर्वस्वी त्या मनावरच अवलंबून आहे. त्यासाठीच समर्थांनीच मानवी मनाला “मना सज्जना’ असे संबोधिले आहे. कारण जेव्हा इतर सर्वजण मनास दोष देत असतात, तेव्हा एकट्या समर्थांनीच त्याला “सज्जना’ असे म्हटले आहे.
द्रष्ट्या समर्थांना मनाची चंचलता, त्याची अधिरता, त्याचे गुंतणे, त्याचा भलेबुरेपणा चांगलाच ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी त्यालाच आंजारून गोंजारून वाईट मार्गावरून सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतात. त्याला सदाचरणाच्या भक्तीची वाट दाखवितात.
मन हेच तुमच्या यशापयशाचे कारण आहे. प्रयत्न मनापासून करा. अभ्यास मनापासून करा. दुसऱ्याचे मन दुखवू नका. वाईट मार्गाकडे मन धावत असेल तर त्याला संयमाचा, विवेकाचा लगाम घाला. मनोनिश्चय जर पक्का असेल तर कोणतीही असाध्य गोष्ट ही नक्कीच साध्य होऊ शकते हे विसरू नका. मनाला गुंतायला, अडकायला, रमायला आवडते ना! मग त्याला राम नामात गुंतवा. त्याला सत्कर्माची भूल पाडा, त्याला स्वानंदाच्या झोक्यावर झुलवा. “अचपळ मन माझे नावरे आवरीता’ असे त्या रघुनाथाला सांगा. तोच ते मन कसे आवरायचे ते तुम्हाला शिकवील. मनाच्या मातीवर प्रेमाचे जल शिंपडा, त्यात सद्विचारांचे बीज पेरा. त्याला संत बोधाचे खतपाणी घाला. त्या मनाला नामाचे कुंपण घाला. मग पाहा थोड्याच दिवसांत तिथे सद्विचार, सद्प्रवृतीचीच उगवण होईल.
मग आपोआपच तुमचे चंचल मन स्थिर, शांत, प्रसन्न होईल. तुमच्या प्रत्येक शारीरिक कृतीला तुमच्याच मनोशक्तीची जोड मिळेल. तुमचे मन तुम्हाला यश, कीर्ती, सुख-समाधान हे सारं मिळवून देईल. तुमचे जीवन एका वेगळ्याच आनंदाने भरून जाईल.