जम्मू – काही महिन्यांपासून संपावर असणाऱ्या काश्मिरी पंडित आणि इतर अल्पसंख्याक समुदायांतील सरकारी कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सज्जड इशारा दिला आहे. घरी बसण्यासाठी वेतन मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात मागील काही काळापासून दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून दहशतवादी प्रामुख्याने काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत.
देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क; केंद्राकडून घेण्यात आला आढावा
चालू वर्षी मे महिन्यात दहशतवाद्यांनी राहुल भट या काश्मिरी पंडित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या केली. त्यामुळे सुरक्षेबाबत आधीपासूनच चिंतेत असणाऱ्या काश्मिरी पंडित समुदायाची अस्वस्थता आणखीच वाढली. त्यातून त्या समुदायातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. अनेकांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून काश्मीर खोरे सोडून जम्मूत मुक्काम ठोकला. काश्मीर खोऱ्याबाहेर नियुक्ती होण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.
काश्मिरी पंडितांनी संप मागे घ्यावा यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर, सिन्हा यांनी संप करणाऱ्यांना इशारेवजा संदेश दिला. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्यात आली आहेत. संप करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये करण्यात आल्या आहेत.
काहींच्या नियुक्त्या तालुक्या मुख्यालयांत, तर काहींच्या शहरांजवळील गावांत करण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागात रूजू असणाऱ्यांच्या बदल्या शहरांत केल्या जाऊ शकत नाहीत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे 31 ऑगस्टपर्यंतचे वेतन देण्यात आले आहे. पण, घरी बसण्यासाठी वेतन देता येऊ शकणार नाही, अशी परखड भूमिकाही त्यांनी मांडली.