नवी दिल्ली- राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्याने शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार गेला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला असून याबाबत थेट सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
राज्यसभा सदनातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बदलल्याचे पाहून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय एखाद्याने घेतला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी नायडूंना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
एनडीएतून शिवसेनेला हटवण्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झालेली नसताना या अतार्किक कृत्यामागील कारण मला समजत नाही. या निर्णयामुळे सदनाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली आहे. मी विनंती करतो की महाराष्ट्रातील दीनदुबळ्या जनतेचा आवाज मांडता यावा, यासाठी आम्हाला पहिल्या/दुसऱ्या/तिसऱ्या रांगेतील जागा द्यावी आणि सभागृहाचा सन्मान राखावा, असेही राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा देत एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबाबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी घोषणा केली होती.
अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची रवानगी पहिल्या रांगेतून तिसऱ्या रांगेत करण्यात आली होती. शिवसेनेच्या लोकसभेतील इतर खासदारांनाही नवीन जागा देण्यात आल्या. सावंत यांनी गेल्या आठवड्यात अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा देत सेना-भाजप युतीच्या फुटीचे संकेत दिले होते. त्यानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त भार प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्यात आला.