नवी दिल्ली – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आता कॉंग्रेसने आणखी एक पाऊल उचलत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी तपशीलवार तथ्य सादर करण्यासाठी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाची नेमणूकीची मागणी करणार एक निवेदन कॉंग्रेसने राष्ट्रपतींना दिले आहे.
कॉंग्रेसच्या या शिष्टमंडळात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार ए. के. अँटनी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी, खासदार के.सी.वेणुगोपाल आणि खासदार अधीर रंजन चौधरी या नेत्यांचा समावेश असेल, असे कॉंग्रेसच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाची घटना धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशच्या या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्याहूनही दुःखद बाब म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिलेला खुला इशारा. अजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगाच हे वाहन चालवीत होता.
दरम्यान सर्व स्तरांतून तीव्र निषेध आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करूनही अद्याप दोषीवर किंवा संबंधित मंत्र्याविरुद्ध कोणतीही निर्णायक, ठोस कारवाई झालेली नाही. म्हणूनच, या प्रकरणी तथ्याचे तपशीलवार निवेदन सादर करण्यासाठी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ लवकरात लवकर तुमच्या भेटीची मागणी करत आहे, असे कॉंग्रेसच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.