भाष्य (अंजली खमितकर) – आपल्यातील मानसिक आरोग्याच्या संबंधित गोष्टी वेळीच ओळखून उपाययोजना केल्यास आपले मानसिक आरोग्य तर चांगले राहीलच. परंतु त्याबरोबरच सामाजिक आरोग्यही चांगले राखण्याला मदत होईल. आपले मानसिक आरोग्य चांगले तर कुटुंबाचे चांगले असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. दि. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याबद्दल…
एका रात्री दंगे झाले. खूप हिंसाचार झाला. तो पाहून एका व्यक्तीला रात्रीचीच भीती वाटू लागली. सायंकाळ झाली की, ते घरात बसूच शकत नाहीत. शांतता नको वाटते. एखाद्या वर्दळीच्या किंवा सुरक्षित जागी जाऊन बसू असे त्यांना वाटायला लागते आणि ते घर सोडतात.
रेल्वेस्थानक, एसटी स्थानक अशा ठिकाणी ते जाऊन बसतात. गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी धड झोपही घेतली नाही. त्यांना सगळा “सेन्स’ असतो. परंतु ते मानसिक रोगी आहेत. त्याला हल्ली “डिप्रेशन’ असे गोंडस नावही देण्यात आले आहे.
वेड लागणे, वेडाचे झटके येणे, असबद्ध बडबड, कपड्याचे, स्थळ-काळाचे भान न ठेवता रस्त्यावर फिरणे, आत्ममग्न असणे इत्यादी इत्यादी स्थिती असेल तरच त्या व्यक्तीचे मानसिक आजार झाला किंवा मानसिक आरोग्य बिघडले, असे म्हणण्याची पद्धत काही वर्षांपर्यंत होती. किंबहुना त्याची व्याख्या तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. मात्र, आता प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी या मानसिक रोगाची बळी पडलेलीच असते. याचा विचार केला जात नाही, कारण ती गोष्ट टोकाला गेलेली नसते. मानसिक आजाराबाबतच्या समाजातील अनेक चुकीच्या आणि वाईट समजुतींच्या श्रुंखला तोडून आता खऱ्या अर्थाने प्रत्येकाचे मानसिक आरोग्य तपासणे आणि त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. 10 ऑक्टोबर हा “जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
समुपदेशनातून सुचवले जातात उपाय
जसे पोटात दुखते, हात पाय दुखतात, शारीरिक व्याधी होतात तसे मनही आजारी असू शकते, त्यालाही दुखणे होऊ शकते. शारिरिक दुखणे हे दिसून येते परंतु मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. हल्ली याचे प्रमाण वाढले असून, ही बाब लक्षात आल्यानंतर लगेचच समुपदेशन करून घेण्यावर अनेकांनी आता भर देण्याला सुरूवात केली आहे. लहान मुलांपासून ते अगदी ऐंशी-नव्वदीत असलेल्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांचेच हल्ली समुपदेशन केले जाते. लहान मुलांसाठी तर शाळेतच समुपदेशन केंद्र चालवले जाते. त्यातून मुलांच्या वागण्या, बोलण्यातील, मनातील सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्या पालकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्यावरचे उपायही सुचवले जाते.
ताण-तणाव ठरतात जीवघेणे
नोकरी-व्यवसायतही अनेक ताणतणाव हल्ली पहायला मिळतात. त्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. सतत एखाद्या तणावात राहिल्यामुळे अनेकांमध्ये चिडचिड, मानसिक विकृती निर्माण होत जाते. आरोग्याचे “टेन्शन’ही अनेकांना असते. आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाणही जास्त आहे. हे खाल्ल्याने ते होईल, ते खाल्ल्याने हे होईल अशी समजूत अनेकांची असते, त्यामुळे उगाच आरोग्याची जास्त काळजी करणाऱ्यांचाही समावेश मानसिक रोगींमध्ये होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला टेन्शन आले की त्याचा परिणाम अति खाण्यावर किंवा उपाशी राहण्यावर अशा दोन टोकांच्या गोष्टीवर होतो. त्याचा परिणाम साहजिकच मानसिकता बिघडण्यावर होतो.
मोबाइलमुळे तर…
मोबाइलचे व्यसन आणि मानसिक आरोग्याची हानी हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा आहे. एखादा कॉल आला नाही, मेसेज आला नाही, किंवा केलेल्या मेसेजला उत्तर आले नाही, मोबाइल गेममध्ये हरलो, अनेक तर्क वितर्क या सगळ्या गोष्टी या मानसिक आरोग्य बिघडल्याचेच लक्षण आहे. त्यातून जागरणे, डिप्रेशन हे प्रकार होतात. मोबाइलमध्ये लाइव्ह जाऊन आत्महत्या करतानाचे अनेक व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्ती दिसतात. हादेखील मानसिक अनारोग्याचा प्रकार आहे.