- खासदार कोल्हे यांचा इशारा; राष्ट्रवादीकडून आक्रमकतेचे संकेत
पिंपरी – “करोना’काळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अनेक बाबींची सुरस कथा समोर येत आहेत. या कालावधीत कुठे-कुठे पाणी मुरले, कोणी कोणी स्वत:च्या तुंबड्या भरल्या त्या सर्वच बाबी जनतेसमोर येत्या काळात उघड्या केल्या जातील तसेच स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला. तसेच येत्या काळात राष्ट्रवादी अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेतही कोल्हे यांनी यावेळी दिले.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आकुर्डी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अजित गव्हाणे, शाम लांडे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, सुलक्षणा शिलवंत यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच महापालिकेतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी अंधाऱ्या रात्रीत काढलेल्या निविदांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा समोर येत होत्या. मात्र नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्यामुळे त्यावेळी विरोध केला नाही. आता मात्र चुकीचे काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. करोना योद्धांच्या पाठीशी राष्ट्रवादी समर्थपणे उभी असून चुकीचे काम करणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नाही. शहरातील करोनाचे रुग्ण कमी झाल्याचा होत असलेला दावा देखील फोल असून सध्या सुरू असलेल्या रॅपिड टेस्टची अचूकता ही केवळ 30 ते 40 टक्केच आहे. चुकीचे अहवाल येत असल्याने संख्या कमी दिसत आहे. महापालिकेने आपला अक्षम्य गलथानपणा बंद करून स्वॅब टेस्ट वाढवून अहवाल तात्काळ मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
नदीसुधार, स्मार्ट सिटी, पाणीपुरवठ्यासारख्या प्रकल्पांच्या निविदामध्ये अनेक बाबी जनहिताऐवजी सत्ताधाऱ्यांचे हित साधणाऱ्या आहेत. चुकीचे प्रकल्प करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना उत्तरे द्यावीच लागतील, असा इशाराही कोल्हे यांनी यावेळी दिला. यापुढे प्रत्येक मुद्यावर राष्ट्रवादीकडून सडेतोड भूमिका घेतली जाईल व सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर मांडला जाईल, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
हाथरसप्रकरणी भाजपाचा निषेध
हाथरसमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्रात उठसुठ किरकोळ गोष्टींवरून राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणारे आता गप्प का? असा प्रश्न कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपाच्या राज्यात राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत असल्याचेही कोल्हे म्हणाले.
प्रशासनाचा अक्षम्य गलथानपणा
स्वॅब टेस्टचे अहवाल दोन-तीन दिवस उशिरा येत आहेत. या दोन ते तीन दिवसांच्या कालावधी ज्याची चाचणी केली तो व्यक्ती “करोना’ कॅरियर म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे इतरांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता असतानाही एवढा उशीराने अहवाल येणे हा प्रशासनाचा अक्षम्य गलथानपणा असल्याचे कोल्हे म्हणाले. या प्रकाराबाबत प्रशासनाला जाब विचारला जाईल तसेच यापुढे तात्काळ अहवालासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही कोल्हे म्हणाले.
करोना योद्ध्यांचा सन्मान
करोना काळात ज्यांनी योगदान दिले अशा चार व्यक्तींचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वधर्मियांवर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणारे तसेच प्लाझ्मादानासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले अशा चारजणांना “करोनायोद्धे’ म्हणून यावेळी गौरविण्यात आले.