वाल्हे – वाल्हे ग्रामपंचायतीसह कोविड समितीने केलेल्या प्रयत्नांमुळे करोनाची साखळी वाढू न देण्यात आजपर्यंत वाल्हेकर यशस्वी ठरले आहेत. यापुढेही गावामध्ये करोनाचा प्रादुर्भाव न वाढविण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. राजकारणाविरहीत काम करून सर्वांनी एकत्रीत येऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध राहु; अशी ग्वाही पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
वाल्हे (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावांतर्गत ओढ्याच्या स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले, हनुमंत पवार, जयवंत भुजबळ, दीपक कुमठेकर, दादा म्हेत्रे, पंढरीनाथ भुजबळ, मारूती पवार, अजित भुजबळ आदि उपस्थित होते.
वाल्हे गावांतर्गत ओढ्याची वर्षोनुवर्षे स्वच्छता न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. करोनाच्या महामारीमध्ये ग्रामस्थांना दूषित पाण्यासह डासांचा प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने दोन दिवसांपासून, ओढ्यामध्ये वाढलेले गवत, झाडे-झुडपे, आणि साचलेला कचरा काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.