नवी दिल्ली – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि भारतविरोधी विदेशी शक्ती तुकडे तुकडे टोळीच्या मदतीने भारतावर हल्ला करतात. पण आम्ही संपूर्णपणे लोकशाहीवादीच आहोत. तरिही भारतीय न्यायपालिकेला सरकारविरोधी बनण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. भुवनेश्वर, ओडिशात केंद्र सरकारच्या कायदा अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना कायदामंत्री बोलत होते.
रिजिजू म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि न्यायपालिकेवर कधीही विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. भारतीय लोकशाहीवर कोणी प्रश्न विचारू शकत नाही कारण लोकशाही आमच्या रक्तात आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काहीही करू दिले जाऊ शकत नाही. असे झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण नवजीवनाचा प्रवास सुरू केला आहे, हे तुकडे-तुकडे टोळीतील सदस्यांनी समजून घेतले पाहिजे, असे कायदामंत्री म्हणाले. या टोळ्यांना भारतविरोधी विदेशी शक्तींची मदत मिळते. या शक्ती भारतीय लोकशाही, भारत सरकार, न्यायपालिका आणि लष्कर, निवडणूक आयोग आणि तपास यंत्रणांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर सतत हल्ले करत आहेत.
कार्यक्रमादरम्यान कायदा मंत्री म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्था अडचणीत असल्याचे देशातून आणि बाहेरून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियावर न्यायमूर्तींना चांगले-वाईट म्हटले जाते, हे दुर्दैवी आहे, सरकारबाबत अशा गोष्टी घडत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, मात्र न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारची टीका करणे योग्य लक्षण नाही.
कायदा मंत्री म्हणाले की, ‘जेव्हा आपल्याला भारत सुरक्षित बनवायचा असेल, तेव्हा कठोर कायदे करावे लागतील. त्यांशिवाय स्वातंत्र्याचा अर्थ उमगणार नाही. जोपर्यंत आपली सीमा सुरक्षित आहे, तोपर्यंत आपण घटनेत दिलेल्या सर्व हमींची अंमलबजावणी करू, अन्यथा देशात अराजकता पसरेल. आपण आपला समाज तरतुदींनी परिपूर्ण बनवला पाहिजे तरच आपण पूर्णपणे सुरक्षित राहू. स्वातंत्र्य आणि हक्क मिळवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, हे सर्वांना ज्ञात आहेच.