संतप्त नागरिकांची मागणी, अपघातांच्या घटनांमध्ये वाढ
वाठार स्टेशन – लोणंद ते सातारा रस्त्यावरून होणारी जड वाहतूक पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची कामे पूर्ण होईपर्यंत बंद करावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लोणंद ते सातारा हा राज्यमार्ग सध्याच्या काळात वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहन चालकांनाही जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते, अशा परिस्थितीतसुद्धा याच रोडवरून अवजड वाहने बिनधास्तपणे चाललेले असतात.
या रोडवरून दिल्ली राजस्थानकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या मोठ्या कंटेनरमधून अथवा ट्रकमधून भरपूर प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. तसेच परराज्यातून येणारे ट्रकमधील टनेज क्षमता आरटीओने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे या ओव्हरलोड वाहतुकीमुळे लोणंद ते सातारा रस्त्यांची फार विचित्र अवस्था झाली आहे. या बाबीकडे
परिवहन विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.
अशा येणाऱ्या-जाणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर जर परिवहन विभागाने कारवाई केली तर रस्ते खराब होणार नाहीत. त्यासाठी या गोष्टीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे तसेच लोणंद ते सातारापर्यंत असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलांची चांगल्या पद्धतीने डागडुजी करून त्यानंतर जड वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच पोलीस प्रशासनाने लोणंद ते सातारा दरम्यानच्या रोडवर अवजड वाहतूक बंद असल्याचे बोर्ड लावलेले आहेत. तरी देखील त्याठिकाणी पोलीस हजर नसल्यामुळे रात्री तसेच दिवसाची सुद्धा जड वाहतूक राजरोसपणे चालू आहे. तरी जिल्हा पोलिस प्रशासनाने या रस्त्यावरून होणारी जड वाहतूक तातडीने बंद करावी व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तसेच परिसरातील सर्व पुलांची दुरुस्ती करून घ्यावी त्यानंतरच जड वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.