श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर शेजारील देश पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ रोज संशयित हालचाली करण्यात येत आहेत. परंतू, पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या या सर्व हालचालींचा भारतीय लष्कराचे जवान चांगलाच समाचार घेत आहेत. त्यातच आता जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळून देशात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. पाकिस्तानचे दोन दहशतवादी जम्मूत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते त्याच दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. तसेच या दोन्ही दहशतवाद्यांकडून सध्या कसून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर देशात 300 ते 350 दहशतवादी देशात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीरसह देशात अनेक ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.