पुणे – उत्पादकांकडून वितरक घेत असलेल्या वाहनांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचबरोबर वितरकांकडून ग्राहकांद्वारा खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येतही घट झाली आहे. याची दखल सरकारने घेतली असून वाहनावरील जीएसटी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीत घट झाली असल्यामुळे या क्षेत्रात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. ऑगस्टमधील वाहन विक्रीही साधारणपणे 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक निर्णय घेत आहेत. पुणे आणि चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना या विषयाकडे लक्ष वेधले असता त्यांनी वाहनावरील जीएसटी कमी होण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र, हा विषय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत नसून जीएसटी परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. या विषयावर वाहन उत्पादकांच्या संघटनेने वेळोवेळी निवेदने करून जीएसटीचा दर 28% यावरून 18% करण्याची मागणी केली आहे. वितरकांच्या संघटनेनेही याकडे सरकारचे अनेकवेळा लक्ष वेधले आहे.
ग्राहक संभ्रमित अवस्थेत
केंद्र सरकारने बॅंकांना वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, ग्राहक संभ्रमित अवस्थेत असल्यामुळे आणि जीएसटीमुळे वाहनांचे दर वाढले असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी पुढे येत नाही, अशी परिस्थिती आहे.
गेल्या अनेक महिन्यांत वाहन विक्री कमी झाली तरी सणाच्या काळात ही तूट भरून निघण्याची आशा वितरकांना असते. यावेळीही वितरक आशावादी आहेत. मात्र, सण सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन जीएसटी परिषदेच्या माध्यमातून जीएसटी कमी केला तर सणांच्या काळात वाहन विक्री वाढण्यास मदत होईल.
– राजन वढेरा, अध्यक्ष, वाहन उत्पादक संघटना