नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांना देशभरातील शेतकरी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवत आहेत. त्या कायद्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कृषी सुधारणांमागील भावना आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी समजून घ्याव्यात, असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी केले.
कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणखी एका शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी तोमर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तोमर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे कायद्यांना विरोध करणाऱ्यांशी आणि पाठिंबा दर्शवणाऱ्यांशीही आम्ही चर्चा करत आहोत.
कायद्यांना पाठिंबा दर्शवणारी पत्रं आणि फोन आम्हाला येत आहेत. आंदोलन करणाऱ्या संघटना शेतकरी हिताचा विचार करतील. त्यातून तोडगा निघण्यास हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी सहा आठवड्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी त्यांच्या संघटनांच्या नेत्यांशी सरकारने चर्चा प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, चर्चेच्या सात फेऱ्या होऊनही तोडगा निघू शकलेला नाही. आता आठव्या फेरीची चर्चा 8 जानेवारीला होणार आहे.